
साक्री (धुळे) : तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज वाढणारा आकडा पाहता ही संख्या धोकादायक वळणावर येऊन ठेपल्याचे दिसत आहे. एकीकडे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असली, तरी लोकांमध्ये मात्र अजूनही याबाबतचे गांभीर्य दिसून येत नाही. अशातच प्रशासनही यात उपाययोजना करताना कमी पडत असल्याचे दिसून येत असल्याने आगामी काळात चिंताजनक स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा शंभरी पार करत असून, मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. तालुक्यात सध्या ज्या काही खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार केले जाताहेत. त्यातील बहुतांश रुग्णालयातील बेड फुल झाले असून, शासनाच्या भाडणे येथील कोविड सेंटरचे बेड अपुरे पडायला लागले आहेत. अशातच आता आणखीन काही ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून तयारी केलीय जातेय. मात्र रोज वाढत असलेली रुग्णसंख्या चिंताजनक असून, लोकांनी किमान आतातरी गांभीर्याने याकडे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
आकडेवारी सदोष?
गेल्या वर्षी कोरोनाची सुरवात झाली, तेव्हा कोविडच्या सर्व चाचण्या केवळ शासकीय रुग्णालय अथवा कोविड केअर सेंटर येथेच होत असल्याने यातून खरी रुग्णसंख्या समोर येत होती. आता मात्र शासकीय सोबतच खासगी ठिकाणीही चाचण्या होऊ लागल्याने प्रशासनाकडून जाहीर होणारी रुग्णसंख्या आणि प्रत्यक्ष रुग्णसंख्या यात मोठी तफावत असण्याची शक्यता आहे. हीच स्थिती मृत्यू संख्येबाबतही आहे. प्रशासकीय आकडेवारीनुसार तालुक्यात कालपर्यंत केवळ सहा जणांचा मृत्यू कोरोनामुळे झालाय, मात्र प्रत्यक्षात हा आकडा खूपच मोठा असण्याची शक्यता आहे. खासगीत उपचार घेणाऱ्यांची तसेच तेथे मृत्यू होणाऱ्यांची नोंद प्रशासनाकडे होत नसल्याने ही आकडेवारी सदोष असण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडूनही सर्व माहिती संकलित करण्याकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचे यातून स्पष्ट होत असून, यामुळे संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
समन्वयाचा अभाव
पूर्वी कोरोनाबाधित रुग्ण आढळला, की लगेच त्यास उपचारासाठी दाखल केले जायचे, त्याच्या संपर्कातील लोकांची चाचणी केली जायची, तो राहत असलेल्या परिसरात फवारणी केली जायची. आता मात्र असे होताना दिसून येत नाही. या वेळी प्रशासनात समन्वयाचा अभाव दिसून येत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास उशीर होत असल्याचा आरोप होत आहे. कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणायची असेल, तर लोकांनी गांभीर्याने नियमांचे पालन करण्याची गरज असतानाच प्रशासनानेही यातील उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. अन्यथा हा धोका दिवसागणिक मोठा होत जाणार आहे.
संपादन - राजेश सोनवणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.