नवापूरमध्ये पोल्ट्रीफार्मच्या कोंबड्यांचा मृत्यू; निनावी तक्रार अन्‌ प्रशासनाकडून जागेवर पंचनामा 

bird flu
bird flu

नवापूर (नंदुरबार) : शहरातील एका पोल्ट्रीफार्मच्या २० ते २२ हजार कोंबड्या मृत झाल्याने त्यांना खड्ड्यात पुरण्यात आल्याच्या निनावी तक्रारीवरून मंगळवारी (ता. २) तहसीलदारांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी व तलाठी यांनी संबंधित पोल्ट्रीफार्मवर जाऊन पंचनामा केला. कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लू, राणीखेत की अजून कोणत्या आजाराने झाला हे प्रयोगशाळा अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र कोंबड्यांच्या मृत्यूबाबत गोपनीयता पाळल्याने शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. 
येथील एकाच पोल्ट्रीफार्ममध्ये सहा ते सात शेड असून, प्रत्येक शेडमधील शंभर-सव्वाशे कोंबड्या व पिल्ले मृत्युमुखी पडत आहेत. असे दोन-तीन आठवड्यांपासून रोज सातशे आठशे कोंबड्या मृत होत असल्याचे संबंधित कुक्कुटपालन व्यावसायिकाचे म्हणणे आहे. कोंबड्या बर्ड फ्लूने मरत नसल्याचे पंचनामा करणाऱ्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना व्यावसायिकाने सांगितले. दरम्यान, तालुक्यात बर्ड फ्लूचा धोका नसल्याचे वृत्त १४ जानेवारीला प्रसिद्ध झाले होते. बर्ड फ्लूचे वृत्त समजताच येथील पोल्ट्री असोसिएशन व व्यावसायिकांशी संपर्क साधला असता त्यांनी या आजाराबाबत दुजोरा दिला नाही. 

खबरदारीचे आदेश
देशातील बर्ड फ्लूचा धोका वाढला आहे. त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री उद्योग सुरू आहे. योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. याबाबत कुक्कुटपालन व्यवसाय करणारे चिंतेत आहेत. तालुक्यात १३ ते १४ कुक्कुटपालन व्यवसाय आहेत. २००६ मध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्यापासून व्यावसायिकांनी कोंबड्यांना एच-५, एन-१ ची लागण होऊ नये यासाठीही खबरदारी घेतलेली आहे. मात्र कुठेही पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला तर जिल्हा प्रशासनाला काळविण्याचे आदेश असूनही संबंधित व्यावसायिकाने तसे न केल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 
 
कुक्कुटपालन व्यवसायातील कोंबड्यांचा मृत्यू अनेक आजारांमुळे होतो. परंतु भीतीमुळे आमच्या व्यवसायावर परिणाम झालेला आहे. पशुसंवर्धन विभागातील तज्ज्ञांशी संपर्कात याबाबतीत भोपाळ येथील एकमेव प्रयोगशाळा आजाराबाबत अहवाल देते. मात्र घाबरण्यासारखी परिस्थिती नाही. 
- आरिफभाई बलेसरिया, अध्यक्ष, पोल्ट्री असोसिएशन, नवापूर 
 
नवापूर शहरालगतच्या पोल्ट्रीफार्ममध्ये कोंबड्यांचा अकस्मात मृत्यू होत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार मंडळ अधिकारी, नवापूर यांच्यामार्फत तपासणी केली असता हे मृत्यू राणीखेत या आजारामुळे होत असल्याचे पोल्ट्रीचालकाने सांगितले. याबाबत तालुका पशुवैद्यकीय अधिकारी, नवापूर यांना सर्व पोल्ट्रीफार्मची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे कळविले आहे. नागरिकांनी याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. 
- मंदार कुलकर्णी, तहसीलदार, नवापूर 

संपादन ः राजेश सोनवणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com