कोरोना रुग्ण आढळल्याने एरंडोलकर धास्तावले...प्रशासनाकडून उपाययोजना

कोरोना रुग्ण आढळल्याने एरंडोलकर धास्तावले...प्रशासनाकडून उपाययोजना

अमळनेरः शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. रस्ते बंद केल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत

नियमांचे पालन करावे 
पालिकेतर्फे कोरोना रुग्ण सापडलेल्या भागात स्वच्छता मोहीम हाती घेऊन औषध फवारणी सुरू केली असून,शहरातील अनेक रस्ते बंद करण्यात आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे तसेच महिलांचे हाल होत आहेत. नागरिकांनी शासकीय आदेशांचे पालन करून घरातच थांबावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. एरंडोल तालुका कोरोनापासून अलिप्त होता. प्रशासनाने शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी विशेष प्रयत्न केले होते. मात्र, अखेर शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रवेश झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

दोन पोलिस बाधित 
शहरातील ४५ वर्षीय कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वडिलांचाही मृत्यू झाल्यामुळे नागरिकांच्या मनातील भिती आणखी वाढली आहे. सद्यःस्थितीत शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोन असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात दोन पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तसेच मालेगाव येथून बंदोबस्तावरून परतलेल्या व शहराबाहेरील शाळेत क्वारंटाईन केलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. नागरिकांची चिंता वाढली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचेही स्वॅब घेण्यात आले असून, त्यांचा अहवाल अद्यापपर्यंत प्राप्त झालेला नाही. 

बुधवार, रविवारी जनता कर्फ्यू 
पोलीस प्रशासनातर्फे गस्त वाढवण्यात आली असून स्वत: पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे,तुषार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सोशल डीस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करीत आहेत. शहरातील विविध रस्ते बंद करण्यात आले असून रस्ते बंद करण्यात आल्यामुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेतर्फे शहरात असलेल्या कंटेन्मेट झोन परिसरात आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वाटप तहसीलदार अर्चना खेतमाळीस, कार्यालय अधीक्षक संजय ढमाळ, नगरसेवक योगेश महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शहरात तीन दिवस जनता कर्फ्यु पाळण्यात आला असून बुधवार व रविवार या दोन दिवशी जनता कर्फ्यु पाळण्यात येत आहे. 

सोशल डिस्टन्सिंगचे आवाहन 
शहरातील स्वॅब घेतलेल्या नागरिकांचे अहवाल अद्यापपर्यंत न आल्यामुळे नागरिकांच्या मनातील भिती वाढली आहे. शहरात विविध अफवांचे पेव फुटले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. शहरासह ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होऊ नये यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाय योजना केल्या जात आहेत. दरम्यान शहरातील काही भागात तसेच भाजी बाजारात सोशल डीस्टन्सिंगचे पालन केले जात नसल्याची परिस्थिती असून याठिकाणी पालिकेने कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शासकीय आदेशांचे पालन करून घरातच थांबावे असे आवाहन प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अर्चना खेतमाळीस, मुख्याधिकारी किरण 
देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com