पाहा ना...शहर वाढले तरी 75 थांबे मंजूर होईना! 

auto
auto

धुळे : लोकसंख्या वाढीमुळे शहर विस्तारतेच आहे. मात्र त्याचा वाहतूक व्यवस्थेवर कुठलाही सकारात्मक परिणाम दिसून येत नाही. यात प्रामुख्याने वाहतूक व्यवस्थेची मदार असलेल्या रिक्षाचालकांच्या वाहन थांब्याचा प्रश्‍न अद्याप अनुत्तरीतच आहे. शहरात 105 मंजूर वाहन थांबे आहेत, तरीही अद्याप 75 रिक्षाथांबे मंजुरीच्या प्रतीक्षेतच आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात रिक्षा युनियनचे अध्यक्ष मच्छिंद्र ठोंबरे यांनीही "सकाळ'कडे कैफियत मांडली. 

वाहतुकीची वाढती समस्या 
महापालिका हद्दीत अंशतः नगावसह एकूण 11 गावांचा समावेश झाल्याने शहराचा विस्तार झाला. तथापि, शहरातील प्रमुख रस्ते अरुंद असून, त्यांचे विस्तारीकरण झालेले नाही. परिणामी वाहतुकीचा खोळंबा हा नित्यनियम आणि धुळेकरांना डोकेदुखी विषय झाला आहे. तसेच पाचकंदील परिसर, जेटी कराचीवाला चौक, खंडेराव बाजार, मुख्य बसस्थानक, जुना आग्रा रोड येथे रिक्षा वाहन थांबे आहेत. यात एकेरी मार्गाने वाहतूक होत असल्याने वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात उद्‌भवते. शिवाय दत्तमंदिर परिसर, नेहरू चौक, वाडीभोकर रोड आदी भागात वाहतुकीच्या समस्या कायम आहे. 

थांब्यांचा प्रस्ताव धूळखात पडून 
शहरातील वर्दळीच्या ठिकाणी सिग्नल व्यवस्थेचा प्रश्‍न जटिल आहे. ही यंत्रणा कार्यान्वित नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडतो. त्याचे खापर बऱ्याचदा रिक्षाचालकांवर फोडले जाते. वाहतुकीच्या अनुषंगाने हा नित्याचा त्रास कमी होण्यासाठी 2005 पासून शहर वाहतूक शाखा, "आरटीओ' विभागासह महापालिका व जिल्हाधिकाऱ्यांकडे नव्याने 75 रिक्षाथांब्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर झाला. यात प्रत्येक विभागाने निश्‍चित केलेल्या रिक्षाथांब्याचा पाहणी अहवालही सादर झाला. तो अंतिम मंजुरीसाठी महापालिका आयुक्‍तांकडे सुपूर्द झाला. मात्र, त्यावर त्या- त्या कालावधीतील आयुक्‍तांनी सकारात्मक भूमिका घेतली नसल्याने अंतिम मंजुरीचा प्रस्ताव अद्यापही धूळखात पडून आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना वाहतुकीसह विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रस्ताव मंजुरीसाठी लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक घटकांच्या पाठबळाची गरज आहे. 
 
अधिकृत रिक्षा थांबा पाहिजे... 
मच्छिंद्र ठोंबरे (अध्यक्ष, बसस्थानक रिक्षा युनियन)
ः शहराबरोबर रस्त्याचेही विस्तारीकरण झाले पाहिजे. वाहतुकीच्या नियोजनांतर्गत नवीन रिक्षाथांब्याचा प्रश्‍न गेल्या पंधरा वर्षांपासून प्रलंबितच राहिला आहे. अधिकृत रिक्षाथांबा राहिल्यास वाहतुकीचा खोळंबा होणार नाही. परिणामी रिक्षाचालकांना होणारा त्रास कमी होण्यास मदत होईल. 
 
आमचेही प्रश्‍न मार्गी लावा... 
नंदकिशोर मराठे (रिक्षाचालक, खंडेराव बाजार परिसर)
ः शहरातील प्रमुख वर्दळीच्या चौकात वाहतुकीच्या समस्यांना सर्वच रिक्षाचालकांना सामोरे जावे लागते. यात प्रामुख्याने खंडेराव बाजार समिती चौक परिसरात अधिकृत रिक्षाथांबा असताना रिक्षाचालकांना वाहतुकीच्या असंख्य अडचणी येतात. आमचे प्रश्‍नही मार्गी लागावेत. 
 
रोजच्या मिळकतीवर परिणाम... 
अशोक पाटील (रिक्षाचालक, धुळे)
ः वाहतुकीचे योग्य नियोजन नसल्याने त्याचा त्रास सर्वसामान्यांसह रिक्षाचालकांना होतो. त्यामुळे रिक्षाचालकांविरुद्ध गैरसमज निर्माण होतात. तसेच बाजारात रोज येणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. वाहतूक समस्यांमुळे प्रवासी मिळत नाही. त्याचा मिळकतीवर परिणाम होतो. आमचे प्रश्‍न कसे सुटणार? 

मागण्या मान्य व्हाव्यात... 
शिवाजी मंगीडकर (रिक्षाचालक, भाई मदाने रिक्षाथांबा) ः
शहरात विनापरवाना ऑटोरिक्षा मोठ्या प्रमाणात धावत आहे. अशा विनापरवानाधारक रिक्षांवर शहर वाहतूक शाखेने कारवाई करावी. शिवाय प्रत्येक वर्दळीच्या चौकात स्वतंत्र वाहतूक पोलिस नियुक्‍त करून वाहतुकीला शिस्त लावावी. त्यामुळे रिक्षाचालकांचा त्रास कमी होईल. आमच्या मागण्या मान्य व्हाव्यात. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com