जळगाव जिल्ह्यातील बळिराजाला 400 कोटींचा फटका

जळगाव जिल्ह्यातील बळिराजाला 400 कोटींचा फटका

भडगाव : शासनाने मोठ्या थाटात शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देण्याचे जाहीर केले. मात्र, प्रत्यक्षात "लबाडाघरचे आमंत्रण, जेवल्यावरच खरं' याचा अनुभव शेतकरी घेत आहेत. कारण, हमीभाव देण्यासाठी शासनाने जी खरेदी केंद्रे सुरू केली आहेत, त्यात अजून मका आणि ज्वारी खरेदीचे आदेशच नाहीत. परिणामी एकट्या जळगाव जिल्ह्यातील बळिराजाला रब्बी हंगामातील गहू आणि मक्‍याच्या कमी भावापोटी तब्बल 400 कोटींचा फटका बसला आहे. आता तरी शासनाने त्वरित ज्वारी व मक्‍याची खरेदी सुरू करून उरल्यासुरल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. 

ज्वारीला 2550 रुपये, तर मक्‍याला 1760 रुपये प्रतिक्विंटल एवढा शासनाचा हमीभाव आहे. मात्र, सध्या खासगी व्यापारी मका 900 ते 1200 रुपये दराने; तर ज्वारी 1500-1800 रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदीत करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील मक्‍याचे अपेक्षित उत्पादन, सध्या मिळत असलेला दर व हमीभाव यांची तुलना केली, तर साधारपणे 374 कोटींचा व ज्वारीतून 35 कोटींचा असा एकूण 400 कोटींचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. 

73 लाख क्विंटल धान्य 
जळगाव जिल्ह्यात रब्बी हंगामात मका व ज्वारी पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदा परतीच्या पावसामुळे भूजलपातळीत मोठी वाढ झालेली होती. पर्यायाने विहिरींना मुबलक पाणी होते. तर गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी तीन आवर्तन सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात तब्बल 85-90 हजार हेक्‍टर क्षेत्रावर मक्‍याची लागवड करण्यात आली होती. म्हणजेच साधारपणे 68 लाख क्विंटल मक्‍याचे उत्पन्न अपेक्षित आहे; तर ज्वारीचे क्षेत्र 10 हजार हेक्‍टरच्या जवळपास होते. त्यातून 5 लाख क्विंटल ज्वारीचे उत्पादन अपेक्षित आहे. आता रब्बी हंगाम काढण्याचे काम सुरू आहे. हमीभाव केंद्र तत्काळ सुरू न झाल्यास एकूण 73 लाख क्विंटल धान्याला मोठा आर्थिक फटका बसण्याची चिन्हे आहे. 

केंद्र केव्हा सुरू होणार? 
सध्या लॉकडाउनमुळे खरीप हंगामासमोर अडचणींचा डोंगर उभा आहे. त्यात हमीभाव खरेदी केंद्र नसल्याने खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकरी नाडला जात आहे. सध्या शासनाकडून जिल्ह्यात हरभरा खरेदीचे 12, तर तूर खरेदीचे 10 केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मका आणि ज्वारी खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना विचारल्यावर ते सुरू करण्याबाबत शासनाचे आदेश नसल्याचे सांगण्यात आले. शासनाने आदेश आल्यास रब्बी ज्वारी व मक्‍याची खरेदी सुरू होईल, असे मार्केटिंग फेडरेशनचे परिमल साळुंखे यांनी सांगितले. अर्थातच दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्याच्या घरातील संपूर्ण धान्य खुल्या बाजारात विकले गेल्यानंतर ही खरेदी सुरू करून शासन "वरातीमागून घोडे' हाकणार असल्याचे दिसत आहे. यातून मात्र व्यापाऱ्यांचेच उखळ पांढरे होणार आहे. 

शासनाने हरभरा, तूर खरेदीबरोबरच ज्वारी, मका व इतर धान्य पिकांचे हमीभाव केंद्र सुरू करायला पाहिजे होते. आता उशीर झाला असला, तरी ती तत्काळ सुरू करावीत. अन्यथा शेतकऱ्यांनी ज्या किमतीत माल विक्री केला तो व हमीभाव यांच्यातील फरकाची रक्कम शासनाने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना अनुदान म्हणून देणे आवश्‍यक आहे. 
- एस. बी. पाटील, सदस्य, शेतकरी सुकाणू समिती 


मका व ज्वारीची हमीभाव केंद्रांवर तातडीने खरेदी सुरू करावी, अशी मागणी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे, त्याची तत्काळ अंमलबजावणी व्हावी यासाठी आग्रही भूमिका घेऊ. 
- किशोर पाटील, आमदार 
 

मका 

- क्षेत्र ः 85 हजार हेक्‍टर 
- उत्पादन ः 68 लाख क्विंटल 
- हमीभाव ः 1760 रुपये 
- बाजारातील भाव ः 800-1200 रु. 
 

ज्वारी 

क्षेत्र ः 10 हजार (हे.) 
उत्पादन ः 05 लाख (क्विंटल) 
हमीभाव ः 2550 रुपये 
बाजारातील भाव ः 1400-1800 रुपये 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com