दररोज तीन हजार विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला 

live photo
live photo

जळगाव : सार्वजनिक दळणवळणाची कोणतीही योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने दुचाकी किंवा ऑटोरिक्षा याच पर्यायांवर दररोज हजारो विद्यार्थी आपल्या शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास करताना दिसतात. विद्यापीठ, अभियांत्रिकी व अन्य महाविद्यालये असूनही पुरेशी बस व्यवस्था नसल्याने सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांसह पंधराशे कर्मचाऱ्यांना जीव धोक्‍यात घालून प्रवास करावा लागतो. 
जळगाव शहरातून बांभोरीकडे वा त्यापुढे विद्यापीठापर्यंत जाणाऱ्या विद्यार्थी, कर्मचाऱ्यांची संख्या कमी नाही. दररोज हजारो विद्यार्थी, कर्मचारी महामार्गावरून सात-आठ किलोमीटरपर्यंतचा प्रवास अगदी जीव मुठीत घेऊन करतात. 

या आहेत शैक्षणिक संस्था 
जळगाव शहरातून महामार्गावरून बांभोरीकडे असलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालय, त्रिमूर्ती महाविद्यालय, नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी महाविद्यालय या शैक्षणिक संस्था स्थित आहेत. 

रोज चार हजार विद्यार्थ्यांचा प्रवास 
महामार्गावरून या चारही महाविद्यालयांमध्ये शहरातून वा इतर ठिकाणांहून जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास तीन ते चार हजार एवढी आहे. तेवढ्याच रुंदीच्या महामार्गावरून जाणाऱ्या अवजड व अन्य वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. शिवाय, या मार्गाच्या दुतर्फा मोठी वस्ती झाल्याने त्या वस्त्यांमधील हजारो वाहने सकाळी सात वाजेपासून रात्री दहापर्यंत या महामार्गावर उतरतात. 

या स्थळांवरुन होतो प्रवास 
विद्यापीठ व त्या भागातील महाविद्यालयांमध्ये शहरातील जवळपास सर्वच भागातून विद्यार्थी- कर्मचारी जात असतात. महामार्गापासून दोन्ही बाजूंना दूर वस्तीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना महामार्गापर्यंत येण्यासाठी एक आणि महामार्गावर आल्यानंतर तेथून दुसरे वाहन शोधावे लागते. महामार्गावर थेट कालिंका माता चौकापासून खोटेनगरपर्यंत जेवढे चौक व क्रॉसिंग लागतात, त्या प्रत्येक स्थळावरुन विद्यार्थी ऑटोरिक्षा अथवा बसने प्रवास करतात. 

जीव धोक्‍यात घालून प्रवास 
अशा स्थितीत शैक्षणिक वाटचालीसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने ऑटो, दुचाकीवर अवलंबून राहावे लागते. हजारो वाहनांच्या गराड्यात हे विद्यार्थी अक्षरश: जीव मुठीत घेऊन ऑटोतून प्रवास करतात, अथवा दुचाकीवर स्वार होताना दिसतात. 
 
पालकांचाही जीव टांगणीला 
हजारो विद्यार्थ्यांचे पालक आपल्या मुलांचे शैक्षणिक करिअर घडविण्यासाठी म्हणून त्यांना महाविद्यालयांमध्ये पाठवितात. मात्र, ज्या विद्यार्थ्यांचा प्रवास या महामार्गावरून होतो त्यांच्या पालकांची अवस्था पाल्य घरी येईपर्यंत अत्यंत चिंतेची असते. पाल्य घरी येईपर्यंत जिवाची घालमेल असते, जीव टांगणीला असतो. दररोजची ही चिंता पालकांच्याही आरोग्यावर परिणाम करते. 

आकडे बोलतात... 
शैक्षणिक संस्था : 05 
विद्यार्थी संख्या : 3 हजार 
कर्मचारी संख्या : 1500 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com