Women's Day : "लिज्जत'च्या "पद्मश्री' पुरस्कारप्राप्त "रुक्‍मिणी'ने शेतात फुलविली "पंढरी' 

womens day
womens day

जळगाव : "लिज्जत पापड' ही जाहिरात आठवतेय. त्याच "लिज्जत'च्या पापड बनविणाऱ्या महिलेपासून थेट श्री महिला गृहोद्योग संस्थेच्या अध्यक्षपदापर्यंत मजल मारली, उत्पादन भारतात नव्हे तर विदेशातही नावारूपास आणले. त्यांच्या या कामामुळे भारत सरकारने पद्‌मश्री पुरस्काराने सन्मानित केले.

वाघळी (ता. चाळीसगाव) येथील "लिज्जत पापड'च्या श्री महिला गृहोद्योग संस्थेच्या माजी अध्यक्षा व पद्‌मश्री पुरस्कारप्राप्त रुक्‍मिणी बाबूराव पवार यांची. वाघळी येथील रुक्‍मिणी पवार यांचे शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत झालेले. त्या काळात लग्न लवकर होत असे. त्यामुळे कुटुंबीयांनी चांगले स्थळ पाहून त्यांचे लग्न लावले. पती बाबूराव पवार मुंबईत प्रिंटींग प्रेसमध्ये कामाला होते. त्यामुळे लग्नानंतर त्या मुंबईत स्थायीक झाल्या. पतीचा पगार जेमतेम असल्याने त्यांनी संसाराला आधार म्हणून शेजारील महिलांच्या मदतीने "लिज्जत पापड'च्या श्री महिला गृहोद्योग संस्थेत रोजंदारीवर पापड लाटण्याचे काम सुरू केले. त्यानंतर त्यांनी अनेक महिलांना पापड लाटण्याठी उद्योग मिळवून देऊन त्यांना आपल्या पायावर आर्थिक सक्षम केले. विशेष म्हणजे महिला गटाची संकल्पना आज अस्तित्वात असली, तरी 1973 मध्ये महिलांचे पापड लाटण्याचे गट तयार केले. त्यातून महिलांना उद्योग मिळवून देऊन आर्थिक सक्षम केले. त्यांचे हे कार्य पाहून "लिज्जत' उद्योगाच्या "श्री महिला गृहोद्योग संस्थे'च्या अध्यक्षपदावर त्यांना नियुक्त केले. त्यानंतर त्यांनी या उद्योग संस्थेचा विकास केला आणि "लिज्जत'नेही यशात कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांनी संपूर्ण भारतात त्या काळी महिलांचे गट तयार करून त्यांना पापड तसेच विविध उद्योगांचे प्रशिक्षण देऊन आर्थिक सक्षम केले. महिला सक्षमीकरणाचे त्यावेळचे हे मोठे कार्य होते. याचीच दखल घेऊन भारत सरकारने 1992 मध्ये राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या हस्ते पद्‌मश्री पुरस्कार देऊन गौरव केला. "लिज्जत पापड'ला नावारूपास आणून श्री महिला गृहोद्योग संस्थेला विश्‍वसनीय उद्योग संस्था बनविली. केवळ भारतात नव्हे तर परदेशातही या संस्थेची उत्पादने लोकप्रिय झाली. शिवाय भारतातील 37 शाखांच्या माध्यमातून सोळा हजार महिलांना रोजगार मिळाला. यशस्विनी असलेल्या रुक्‍मिणी पवार यांच्या जीवनाचा प्रवास मात्र पुन्हा संघर्षाच्या वाटेने सुरू झाला. 

पुन्हा "वाघळी'त संघर्ष 
मुंबईत असताना पतीचे निधन झाले. त्यानंतर त्या आपल्या वाघळी या गावी मुलासह राहण्यास आल्या. त्या दुःखातून सावरत असतानाच वाघळीत साध्या पत्र्याच्या घरात राहून त्यांनी शेती करणे सुरू केले. तर याच ठिकाणी त्यांनी पापड उद्योग "सरगम' नावाने सुरू केला. त्याला प्रतिसाद मिळू लागला. परंतु दुर्दैवाने येथेही साथ सोडली नाही. त्यांच्या दोन्ही मुलांचे आजारपणात निधन झाले. त्यामुळे त्यांना पापड उद्योग बंद करावा लागला. मात्र, त्या संघर्षात हरलेल्या नाहीत. नातू ललित आणि दोन सुनांच्या साथीने त्या शेती करून त्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. 

पद्मश्री पुरस्कार पण शासनाचे दुर्लक्ष 
देशात व परदेशातही नावारूपास आणलेल्या "लिज्जत पापड' या संस्थेच्या श्री महिला गृहोद्योग संस्थेच्या अध्यक्षा असलेल्या रुक्‍मिणी पवार या वाघळीसारख्या लहानशा गावात जीवनसंघर्ष करीत आहेत. त्यांना पद्‌मश्री पुरस्कार मिळाला. मात्र, त्यांच्याबाबत प्रशासन उदासीनच आहे. त्यांना स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमास कधीच पाचारण करण्यात आलेले नाही. एवढेच नव्हे; तर त्यांचे नुकतेच ऑपरेशन झाले त्यावेळी रुग्णालयाने त्यांना कोणतीही शासकीय सवलत देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना वैयक्तिक खर्च करावा लागला. त्यांना याची कोणतीही खंत नाही. परंतु आज महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी केल्या जात असताना महिला सक्षमीकरणासाठी देशभरात राबविण्याचे कार्य करणाऱ्या रुक्‍मिणी पवार यांच्याकडेच शासन दुर्लक्ष करीत आहे. त्यांचा महिला सबलीकरणाच्या कार्याचा फायदा करून महिलांसाठी कार्य करून घेतल्यास त्यांचाही हा सन्मान ठरेल, एवढे मात्र निश्‍चित! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com