जेथे जातील तेथे विखेंच्या खोड्या... माजी मंत्री राम शिंदे यांचा हल्लाबोल

residentional photo
residentional photo

नाशिक- माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना भाजप मध्ये घेतल्यानंतर पक्षाला चांगले दिवस येतील असे वाटले होते परंतू याउलट वातावरण झाले. नगर जिल्ह्यात बाराच्या बारा जागा जिंकून आणण्याऐवजी आहे त्या जागा कमी झाल्या. विखे ज्या पक्षात जातात तेथे खोड्या करून पक्षासाठी हानीकारक वातावरण निर्माण करतात असा हल्बाबोल माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी करताना निवडणुकीच्या तोंडावर भाजप मध्ये आलेल्या इतर पक्षातील नेत्यांचा काहीचं फायदा झाला नसल्याचा दावा त्यांनी केला. 

विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात भाजप उमेदवारांच्या पराभवाची कारणमींमासा करण्यासाठी आमदार आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नगर जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांच्या बैठकीनंतर श्री. शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना नगर जिल्ह्यातील पराभवाचे खापर विखे-पाटील यांच्यावर फोडले. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीपुर्वी नगर जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार होते.

ठराविक पॉकेटस् पुरती ताकद

राधाकृष्ण विखे-पाटील व मधुकर पिचड भाजप मध्ये आल्याने आमदारांची संख्या सात झाली. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत बाराच्या बारा जागा भाजप निवडून आणेल असा दावा विखे-पाटील यांच्याकडून केला जात होता.  जागा सातवरून बारा जाणे तर सोडाचं आणखी कमी झाल्या. निवडणुकीच्या निकालानंतर तीन पर्यंत संख्या आली. नगर जिल्ह्यात विखे-पाटील यांची फार मोठी ताकद होती असे नाही तरीही ठराविक पॉकेटस पुरती त्यांची ताकद होती त्याचाही लाभ झाला नाही. विखे-पाटील जेथेजातात त्या पक्षातील वातावरण बिघडवतात. एकनाथ खडसे व पंकजा मुंडे यांनी पक्षावर केलेल्या आरोपांबद्दल बोलताना शिंदे यांनी पक्षाला दोष देण्यात अर्थ नसल्याचे सांगितले. निवडणुकीतील पराभवाबाबत सादर केलेल्या अहवालानुसार कारवाई होईल अशी अपेक्षाही व्यक्त केली. 

कोल्हे, कर्डीलेंचाही विखेंवर हल्लाबोल 
बैठकीला उपस्थित असलेल्या नगर जिल्ह्यातील स्नेहलता कोल्हे व शिवाजी कर्डीले यांनी देखील विखे-पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. सौ. कोल्हे म्हणाल्या. एका मतदारसंघात विखे यांनी त्यांच्या मेव्हण्याला अपक्ष म्हणून उभे केले. त्यांचीही अनामत रक्कम जप्त झाली. तर कर्डीले यांनी शिंदे व कोल्हे यांच्या आरोपांना पुष्टी देताना दोघांच्या मताशी सहमत असल्याचे सांगितले. 

महाजन बैठकापासून दुर 
बैठकीला अमळनेर, मुक्ताई नगर, रावेर, धुळे ग्रामिण, साक्री, नवापूर, अहमद नगर, कर्जत-जामखेड, कोपरगाव, नेवासा, अकोले व राहुरी या बारा मतदारसंघातील भाजपच्या पराभुत उमेदवारांना बोलाविण्यात आले होते. जळगाव जिल्ह्यातील एकही पराभूत उमेदवार उपस्थित राहीला नाही तर मुक्ताई नगरच्या रोहीणी खडसे यांनी मुलगी आजारी असल्याचे कारण दिले. जे उमेदवार उपस्थित होते त्यातील अनेकांनी माजी मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे देखील बोट दाखविल्याचे समजते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाजन यांच्यावर उमेदवार निवडून आणण्याची मोठी जबाबदारी होती. उत्तर महाराष्ट्रात विधानसभेच्या 48 पैकी 42 जागा निवडून येण्याचा दावा महाजन यांनी केला होता. प्रत्यक्षात 19 महायुतीचे उमेदवार निवडून आले. पराभूत उमेदवारांकडून महाजन यांच्यावर थेट आरोप होण्याच्या शक्‍यतेने त्यांनी बैठकीपासून दुर राहण्याचे टाळल्याचे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com