एनएमएमएस'साठी जिल्ह्यातून साडेतीन हजार विद्यार्थी 

एनएमएमएस'साठी जिल्ह्यातून साडेतीन हजार विद्यार्थी 

जळगाव : आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती अर्थात "एनएमएमएस'च्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील 199 शाळांमधील 3 हजार 442 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सर्वाधिक नोंदणी चोपडा तालुक्‍यातील 28 शाळांमधील 567 विद्यार्थ्यांची आहे. 

येत्या 8 डिसेंबरला राज्यात एकाच वेळी 377 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. जळगाव जिल्ह्यात 9 केंद्रांवर ही परीक्षा होईल. राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधून, त्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्यासाठी आर्थिक साह्य करावे. त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी, यासाठी आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेतर्फे घेतली जाते. 

अशी पात्रता, अशी परीक्षा 
दीड लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलांनाच या परीक्षेला बसता येते. वर्षातून एकदाच ही परीक्षा घेण्यात येत असते. बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपात ही परीक्षा होणार आहे. बौद्धिक क्षमता चाचणीचा पहिला पेपर होणार असून, यात एकूण 90 प्रश्न आणि 90 गुण असतील. शालेय क्षमता चाचणीचा दुसरा पेपर होणार असून, यातही 90 प्रश्न आणि 90 गुण राहणार आहेत. एका पेपरसाठी दीड तासांची वेळ देण्यात येणार आहे. या परीक्षेत किमान 40 टक्के गुण मिळविणारा विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण ठरणाऱ्या विद्यार्थ्याला बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत दरमहा एक हजार रुपयाप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे 

तालुकानिहाय विद्यार्थी : 
तालुका-------एकूण शाळा--- एकूण विद्यार्थी 
अमळनेर------14-----------188 
भडगाव--------5-------------42 
भुसावळ-------15-----------274 
बोदवड---------6----------109 
चाळीसगाव-----15---------406 
चोपडा--------28----------567 
धरणगाव--------6----------122 
जळगाव-------27---------469 
जामनेर--------19----------509 
मुक्ताईनगर------4----------88 
पाचोरा--------13---------209 
पारोळा--------5-----------55 
रावेर---------19----------197 
यावल--------14---------133 

राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधून, त्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्यासाठी आर्थिक साह्य करावे, यासाठी ही शिष्यवृत्ती सुरू केली आहे. पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्याला प्रतिवर्षी 12 हजार रुपये याप्रमाणे चार वर्षे शिष्यवृत्ती दिली जाते. 
- बी.जे. पाटील शिक्षणाधिकारी (माध्यमिक) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com