तळोदा : अर्भक व बालमृत्युदर दर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. देशात पाच वर्षांपर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण असून, ५ ते ७ टक्के बालके अतिसारामुळे दगावतात. या बालमृत्यूचे प्रमाण उन्हाळ्यात व पावसाळ्यात जास्त असते. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून राज्यात ६ ते २१ जून या कालावधीत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येणार असून, नंदुरबार जिल्ह्यातदेखील ही मोहीम राबविण्यात येणार आहे. (Nandurbar Special Diarrhea Control Fortnight in District)
या पंधरवड्यात पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या बालकांच्या घरांमध्ये ओआरएस व झिंकचा वापर तसेच उपलब्धता वाढविणे, अतिसारासह जलशुष्कता असलेल्या बालरुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करणे, कोविडसारख्या इतर संसर्गजन्य आजाराच्या साथीदरम्यान अतिसाराचा प्रतिबंध व नियंत्रण करण्याकरता त्याविषयी प्रचार, प्रसार व संवाद याबाबींवर भर देणे, शहरी झोपडपट्ट्या, पूरग्रस्त भाग, आरोग्यसेविका कार्यरत नसलेली उपकेंद्रे, भटक्या जमाती, वीटभट्टी कामगार, स्थलांतरित मजूर, बेघर मुले यांसारख्या जोखीमग्रस्त घटकांवरही विशेष लक्ष देणे, मागील दोन वर्षांत अतिसाराची साथ असलेले क्षेत्र व पाणीपुरवठा व स्वच्छतेचे अभाव असलेले क्षेत्र यावर विशेष लक्ष देणे ही कामे प्रामुख्याने या मोहोमेत करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हास्तरीय सुकाणू समिती व तालुकास्तरीय सुकाणू समिती बनविण्यात आल्या असून, ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
दरम्यान, आशांमार्फत बालकांची यादी तयार करण्यात येऊन गृहभेटी देऊन ओआरएस पाकिटांचे वाटप करण्यात येणार आहे. लाभार्थी गृहभेटीदरम्यान भेटू शकले नाहीत किंवा बाहेरगावी गेले आहेत अशा लाभार्थ्यांना दूरध्वनीद्वारे समुपदेशन करण्यात येणार आहे.
गाव पातळीवरील कार्यक्रमाचे सनियंत्रण आरोग्यसेविका करणार असून, तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्याधिकारी, आरोग्यसेविका, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक मोहिमेत मेहनत घेणार आहेत. (latest marathi news)
शाळांमध्ये हात धुण्याचे प्रात्यक्षिक
सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार असून, हात धुण्याच्या टप्प्याविषयीचे पोस्टर प्रत्येक आरोग्य संस्था व शाळांमध्ये हात धुण्याच्या ठिकाणी लावण्यात येणार आहेत. दररोज प्रार्थनेच्या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांना हात धुण्याचे महत्त्वाविषयी माहिती देण्यात येणार असून, मध्यान्ह भोजनाच्या आधी सर्व विद्यार्थ्यांना साबण व पाण्याने हात धुण्याचे शिकविण्यात येणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांकडून हात धुण्याचे महत्त्व पटविण्यासाठी पंधरवड्यात प्रभातफेरी काढण्यात येणार आहे.
शहरी भागासाठी मोबाईल टीम
शहरी भागातील झोपडपट्ट्या, स्थलांतरित बालके, रस्त्यावर राहणारी बालके, अनाथ बालके व बालसुधार गृहातील बालके यांच्यापर्यंत पोचण्यासाठी पालिका कार्यक्षेत्रात मोबाईल टीम तयार करण्यात येणार असून, या भागांमध्ये पोस्टर, बॅनरच्या माध्यमातून या पंधरवड्यात कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
त्याबरोबरच जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अंगणवाडी केंद्र, खासगी रुग्णालय अशा ठिकाणी ओआरएस/झिंक कॉर्नर स्थापन करण्यात येणार असून, अतिसाराच्या व्यवस्थापनासाठी ओआरएससोबत झिंक गोळ्या देण्याबाबत प्रोत्साहन करण्यात येणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.