कांबट-मोरघा नृत्याचे अंबई गाव

Live Photo
Live Photo

नाशिक ः कांबट नृत्य अन्‌ महिलांचे मोरघा नृत्यासाठी प्रसिद्ध असलेले अंबई (ता. त्र्यंबकेश्‍वर) हे 950 लोकसंख्येचे गाव. हे नृत्य पाहण्यासाठी पंचक्रोशीची पावले गावाकडे वळतात. पोळ्यापासून दिवाळीपर्यंत हा उत्सव सुरु असतो. 
गावाजवळ अंबई डोंगर असून दोन धबधबे पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. हे गाव रानभाज्यांचे माहेरघर असून पावसाळ्यात गावात प्रत्येकाच्या घरात रानभाजीच खाल्ली जाते. शिवारात कोल्हे, बिबट्या, जंगली डुक्कर, रानससे पाह्यला मिळतात. गावात लाकडी व दगडी चिरा आहेत. त्यांचा अभ्यास व्हायला हवा. गावातून देवी मंदिराकडे जाण्यास रस्ता नाही. रस्त्याचे काम व्हावे अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. तसेच स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता व्हायला हवा, असे ग्रामस्थांना वाटते. अंबादेवीच्या मंदिरावरून गावाला नाव अंबई असे मिळाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावामध्ये अंबादेवी, मारुती, मरीआई ही मंदिरे आहेत. गावाचे वैशिष्ट्य म्हणजे, शंभर वर्षांपासून अखंड सुरु असलेला बोहाडा हा उत्सव आहे. मार्चमध्ये बोहाड्याचा उत्सव होतो. त्यासाठी प्रत्येक घरामध्ये लाकडी जूने मुखवटे आहेत. संपूर्ण रामायण बोहाड्यातून सादर केले जाते. हा उत्सव आठ दिवस चालतो. 
नागली, वरई, खुरासणी, उडीद आदी पिके घेतली जातात. अवकाळी पावसाच्या आपत्तीमुळे भाताचे नुकसान झालेले असताना त्याचे पंचनामे केले जाताहेत, परंतु आमच्या पिकांचे पंचनामे का होत नाहीत? असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करताहेत. गावात पहिली ते पाचवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा असून ही शाळा डिजीटल आहे. इथे पूर्वी कृषी वाचनालय सुरु केले होते. पण त्यासाठी मोठा खर्च असल्याने त्याची अवस्था बिकट बनली आहे. गावातील जंगलात केळी आहेत. इथले ग्रामस्थ त्याची पाने नाशिकमध्ये विक्रीसाठी आणतात. शंकर भूरबुडे, सखाराम भूतांबरे हे नावाजलेले मल्ल गावातील आहेत. गावाच्या दोन विहिरीतून गावाला पिण्याचे पाणी मिळते. गावाजवळ अंबई बंधारा असून गावाला तंटामुक्ती आणि स्वच्छता अभियान पुरस्कार मिळाला आहे. 

गावाने बोहाडा उत्सव आम्ही सुरु ठेवला आहे. गावात रानभाजी महोत्सव भरविण्याची आमची इच्छा आहे. तसेच पर्यटन क्षेत्र म्हणून विकास झाल्यास रोजगार गावाला मिळेल. 
- काशिनाथ लचके (सरपंच) 

गावात विकासाला अनेक संधी आहेत. दोनशे एकर जमीनीच्या व्यवहाराचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. गावात मंदिर आणि स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते खराब आहेत. त्यांची दुरुस्ती व्हावी. तसेच गावात व्यायामशाळा उभारली जाईल. 
- तुकाराम लचके (ग्रामस्थ) 

आमच्या पिकांचे पंचनामे होत नाही. त्यामुळे मोठ्या कर्जाचे काय होणार याची काळजी आहे. गावाजवळील जंगलात वनौषधी वनस्पती आहेत. त्याचा अभ्यास व्हायला हवा. 
- सुकदेव फोफळे (शेतकरी)  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com