येवला (जि. नाशिक) : अतिवृष्टीमुळे आजही पिके पाण्यात असून, अनेक ठिकाणी पिके अक्षरशः सडली आहेत. कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे साहेब पंचनाम्यात दुजाभाव न करता सरसकट सर्व पिकांचे पंचनामे करा, अशी मागणी पूर्व भागातील २० गावातील सरपंच, विविध पदाधिकारी व शेतकऱ्यांनी केली आहे. पंचनाम्यात काही पिके टाळल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशाराही या शेतकऱ्यांनी दिला आहे.
अतिवृष्टीमुळे तालुक्याच्या पूर्व भागात उभ्या पिकांचे संपूर्ण नुकसान झाले असून, खातेनिहाय शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्व पंचनामे करण्यात यावे यासाठी सोमवारी २० गावातील सरपंचांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन तहसीलदारांना निवेदन दिले. ६ ऑक्टोबरपर्यंत मागणी मान्य न झाल्यास ७ ऑक्टोबरला तहसीलसमोर बेमदुत उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. गतआठवड्यात सलग तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्याच्या पूर्व भागात उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यात सोयाबीन, मका, बाजरी, कापूस, कांदा, भुईमूग, कांद्याचे बी आदी पिकांचे संपूर्ण नुकसान झाले असून, प्रशासकीय पातळीवर ठराविक पिकांचे व वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
सर्व सरपंचांनी तहसीलदार प्रमोद हिले यांची भेट घेत नुकसान झालेल्या पिकांची माहिती देत शेतकऱ्यांची व्यथा मांडली. सर्वच पिकांचे नुकसान झालेले असल्याने यातील एकही पीक पंचनाम्यातून वगळू नका अशी विनंती निवेदन देताना तहसीलदारांना केली. शेतकऱ्यांचे हित बघून या नुकसानीतून वाचवा, अशी आर्त विनंती या वेळी सर्वांनी केली. वस्तुनिष्ठ पंचनामे प्रशासनाने केल्यास ७ ऑक्टोबरला सकाळी अकराला तहसील कार्यालयासमोर सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन उपोषणाचा इशारा निवेदनात दिला आहे. सरपंच सविता जगताप, प्रताप दाभाडे, सुभाष वाघ, ठकसेन वर्हे, प्रशांत देशमुख, प्रवीण देशमुख, रावसाहेब लासुरे, खंडू साताळकर, विजयश्री कदम, मुरलीधर सोमासे, अनिता खैरनार, बाळासाहेब दाणे, विजय जेजुरकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक हे पीक पाहणी करून ठराविक पिकाचेच पंचनामे होणार असल्याचे कळले आहे. पूर्व भागात सततच्या पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले असल्याने या भागातील सर्व नुकसानग्रस्त पिकांचे सरसगट पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
-सुरेखा जेजूरकर, सरपंच, भारम
या गावातील सरपंच आले एकत्र
नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी अंदरसूल, बोकटे, देवळाणे, दुगलगाव, सायगाव, खामगाव, गवंडगाव, सुरेगाव, उंदिरवाडी, पिंपळगाव जलाल, नांदेसर, नागडे, कोटमगाव बुद्रुक, आडगाव चोथवा, पांजरवाडी, भुलेगाव, धामणगाव, तळवाडे, गारखेडे, देवठाण, अंगुलगाव आदी गावांतील सरपंच, पोलिसपाटील व शेतकरी तहसील कार्यालयात मोठ्या संख्येने जमा झाले होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.