बोलणाराचं जेवढे वय, तेवढे वर्षे पवार साहेबांची राजकीय कारकीर्द! - अजित पवार

माणसांचे संसार उभे करायला अक्कल लागते, धुडगूस घालायला अक्कल लागत नाही. गेले ५५ वर्ष आमचे नेते शरद पवार सर्व जातीधर्माला सोबत घेऊन चालताय, तरी नको ते आरोप करून राज्याचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSakal
Summary

माणसांचे संसार उभे करायला अक्कल लागते, धुडगूस घालायला अक्कल लागत नाही. गेले ५५ वर्ष आमचे नेते शरद पवार सर्व जातीधर्माला सोबत घेऊन चालताय, तरी नको ते आरोप करून राज्याचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

येवला - माणसांचे संसार उभे करायला अक्कल लागते, धुडगूस घालायला अक्कल लागत नाही. गेले ५५ वर्ष आमचे नेते शरद पवार सर्व जातीधर्माला सोबत घेऊन चालताय, तरी नको ते आरोप करून राज्याचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पवारसाहेब महापुरुषाचे नावच घेत नाही तर त्यांच्या विचारावर चालण्याच काम करत आहेत. बोलणाराचं जेवढे वय तेवढे वर्षे पवार साहेबाचं राजकारणांतल आयुष्य आहे.

लोकांना भडकावून प्रश्न सुटत नाही बांधवांनो...! प्रत्येकाने राज्याच्या हितासाठी विचार करावा, तुम्हांला-आम्हांला प्रगती व विकासासाठी जातीय सलोखा ठेवावाच लागेल असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

येथे पालकमंत्री छगन भुजबळाच्या पुढाकाराने उभ्या राहनाऱ्या राज्यातील आगळ्यावेगळ्या शिवसृष्टीच्या कामाचे भूमिपूजन आज अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी झालेल्या सभेत श्री.पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री छगन भुजबळ होते. यावेळी व्यासपीठावर आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, माजी आमदार मारोतराव पवार, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी सभापती संभाजी पवार, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, कल्याणराव पाटील, हुसेन शेख, जयदत्त होळकर आदींची उपस्थिती होती. प्रारंभी श्री. पवार व श्री. भुजबळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच कोनशिला अनावरण करून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

राज्याला आग लावू नका - भुजबळ

ऐतिहासिक असलेल्या या शहरात शिवाजी महाराजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी कुठेही नाही अशी भव्यदिव्य, आगळीवेगळी शिवसृष्टी उभी राहणार आहे. राजेसह अष्टप्रधान मंडळाची सचित्र माहिती येथे पर्यटकांना व शिवप्रेमींना पाहायला मिळेल असे श्री. भुजबळ यांनी सांगितले. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर या राज्याची वाटचाल सुरू असून शिवाजी महाराज तर सर्वश्रेष्ठ आहेत. त्याचे नाव आज टेन्शन देण्यासाठी वापरले जाते याची खंत वाटतेय. मुस्लिम द्वेष करणारे भिडे गुरुजी सायकलवरून पडले, पण त्यांचेच ऑपरेशन मुस्लिम डॉक्टरानी केले हे सांगत माणुसकीपुढे कुठला धर्म नसल्याचे भुजबळ म्हणाले.

फुले, शाहू, आंबेडकर यांनी सामाजिक क्रांती केली तर शिवाजी महारांजानी सर्व धर्मियांना सोबत घेऊन लोककल्याणकारी राज्य उभे केले. मुस्लिम बांधवांसह सर्व धर्मातील मावळे, सेनापती त्यांच्यासोबत होते. दोन दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी सर्व इतिहास चुकीचा सांगितला. लोकमान्य टिळकांची स्वातंत्र्य चळवळीतील लढाई मान्य पण इतर खोटा इतिहास सांगितला जात असून दिल्लीतही हेच सुरू आहे. उद्या नेहरू नव्हते असेही सांगितले जाईल असा टोमणा त्यांनी मारला. आज शेतकऱ्यासमोर अनेक प्रश्न आहे, पाणी, बेरोजगारी, कोरोना, पेट्रोल-डिझेल महागाई असे असंख्य प्रश्न आहे. पण यावर पांघरून टाकण्यासाठी हे इशू काढले जाताय. मात्र, राज्याला आग लावू नका. मुघलांचा इतिहास आहे की राज्य करू दयायचे नाही, पण राजसाहेब मनाचा खोटेपणा दाखवू नका, उद्धव ठाकरे चांगले काम करताय ते करू द्या, असे आवाहन भुजबळांनी केले.

शिवसृष्टीपूर्ण होईपर्यंत निधी - पवार

भव्य व आगळीवेगळी शिवसृष्टी साकारत असल्याने येवल्यासाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. मी शब्द देतो की शिवसृष्टी पूर्णत्वाला जाईपर्यंत निधी कमी पडू देणार नाही. असे यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. भुजबळसाहेबांनी येवल्याला खूप दिले असून विविध विकासकामातून चेहरामोहरा बदलवला आहे. त्यानी विकासाची गंगा नाशिकमध्ये आणली.

येथे आता पर्यटन वाढेल, रोजगार मिळेल. ही शिवसृष्टी शौर्य, साहस व पराक्रमाची दर्शन घडवले. मावळ्यांच्या योगदान उभे करेल असे पवार म्हणाले. शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकराचा हा महाराष्ट्र आहे, त्याच्या शिकवणीवर आपण वाटचाल करतोय पण त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मराठवाडा नामांतराच्या वेळी सत्ता सोडेल पण पुरोगामी विचारांना तिलांजली देणार नाही, असे पवार साहेबांनी विरोध करणाऱ्यांना सांगितले होते. याउलट बोलणार्यांनी जनतेसाठी काय केलं, राज्यासाठी कोणती कामे केली ते सांगाव. साधी वि. का. सोसायटी, टरबूज-खरबूज संस्था तरी काढली का? सभाही रात्री गारव्यात घेतात, कधी उन्हात फिरून सभा घेतली का? असा टोमणा श्री. पवारांनी मारला.

दोन वर्षे कोरोना आपत्तीत आम्ही रडलो नाही तर मात केली. आरोग्य सेवा बळकट केली असून माणसे जगवयाला प्राधान्य दिले, आता उपलब्ध निधीतून विकासकामे करतोय. अनेक प्रश्न आहेत पण राज्याला सावरल्याचे त्यानी सांगितले.

भोंगे मुद्दा घेऊन वातावरण खराब करण्याचे प्रयत्न होत आहेत. भोंगे बंद करायचे मग जत्रा, उरूस, शिर्डीसह मंदिरातील आरती, गावोगावचे हरिनाम सप्ताह, कीर्तन, जागरण गोंधळ बंद करायचे का असा सवाल करून जीभ उचलणे अन बोलणे सोपे आहे. पण, पुरोगामी महाराष्ट्रात हे शक्य नसल्याचे पवार म्हणाले. यांच्यातून रोजीरोटी, नोकरीचे प्रश्न सुटणार नाही. इतर राज्यात-देशात चुकीचा मेसेज जाईल असेही पवार म्हणाले. यावेळी माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, आमदार नरेंद्र दराडे यांनी मनोगत व्यक्त करून भुजबळांच्या कामाचे कौतुक केले.

बाजार समितीचे मुख्य प्रशासक वसंतराव पवार यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, शहराध्यक्ष दीपक लोणारी, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, माजी सभापती संजय बनकर, बाळासाहेब कर्डक, ज्ञानेश्वर दराडे, मोहन शेलार, मकरंद सोनवणे, राजेश भांडगे, राधकीसन सोनवणे, महेंद्र काले, सुनील पैठणकर, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे, स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, एड. रवींद्र पगार, अंबादास खैरे, मायावती पगारे आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com