
Nashik : महामार्गावरील बॅरिकेड्स वाहनचालकांच्या मुळावर
इगतपुरी (जि. नाशिक) : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग (Mumbai-Agra National Highway) असल्याने या महामार्गावर पोलिसांकडून वाहनांची तपासणी वा चौकशी केली जाते. त्यासाठी बॅरिकेड्स लावले जातात. मात्र, चौकशी किंवा तपासणीनंतर बॅरिकेड्स सुरक्षित अंतरावर ठेवले जात नसल्याने हेच बॅरिकेड्स अपघाताचे कारण बनत आहेत. त्यामुळे महामार्गावरील चौकशी स्थानावरचे बॅरिकेड्स अपघातांना आमंत्रण ठरत आहे. इगतपुरी तालुक्यातील कार अपघातानंतर पोलिसांच्या निष्काळजीपणाचा फटका एका वाहनचालकाला चांगलाच महागात पडला आहे. विशेष म्हणजे तपासणी पथकातील एका पोलिसाने अपघातानंतर वाहनचालकाची माफी मागितली आहे. (Barricades on nashik mumbai highway causes accident)
वाहनचालकाची कोणतीही चूक नसताना झाला अपघात
सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग म्हणून मुंबई- आग्रा महामार्गाची ओळख आहे. महामार्ग आणि अपघात यांचे एक वेगळेच समीकरण असते. कधी ओव्हरटेकमुळे, कधी लेन कटिंगमुळे, तर कधी फाजील आत्मविश्वासामुळे अपघात घडले आहेत. शनिवारी (ता. १४) नाशिकच्या इंदिरानगर येथील व्यावसायिक सचिन विष्णू खरजुल यांच्या कारला झालेल्या अपघातानंतर वाहतूक पोलिसांची वसुलीमोहीम चांगलीच चर्चेत आली आहे. श्री. खरजुल हे कामासाठी इनोव्हा क्रिस्टा कारने (एमएच १५, एफटी ०८४५) नाशिकहून मुंबईकडे जात होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांची कार इगतपुरीजवळील तळेगाव शिवारात हॉटेल मानस ते घाटनदेवीदरम्यान सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेल्या बॅरिकेड्सला आदळून अपघात झाला. या अपघातामुळे वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाहनचालकाची कोणतीही चूक नसताना केवळ सुरक्षिततेसाठी असणारे बॅरिकेड्स निव्वळ सुरक्षित अंतरावर नसल्यामुळेच हा अपघात झाला आहे.
हेही वाचा: नाशिक : वाहनांच्या धडकेत तिघांचा मृत्यू
वाहनधारक सचिन खरजुल यांनी मोटार अपघाताबाबत इगतपुरी पोलिस ठाण्यात नोंद केली असून, महामार्गावरील बॅरिकेड्स महामार्गापासून सुरक्षित अंतरावर ठेवावेत, अशी मागणीही केली आहे. पोलिस निरीक्षक वसंत पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी लोहरे तपास करीत आहेत.
वाहनांचा वेग वाढला
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील विविध ठिकाणचे गतिरोधक आणि झेब्रा क्रॉसिंग नष्ट झाले आहेत. त्यामुळे लहान-मोठ्या अपघातांना आमंत्रण मिळत आहे. गतिरोधक व झेब्रा क्रॉसिंग तातडीने टाकण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. महामार्गावरील रस्ता ओलांडताना गाड्यांचा भरधाव वेग लक्षात न आल्याने अनेकदा छोटे-मोठे अपघात होतात. अनेकदा पायी चालणाऱ्या नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर यातील काहींना कायमचे अपंगत्व आले आहे.
शेतकऱ्यांची तारेवरची कसरत
नाशिककडून मुंबई व मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या- येणाऱ्या गाड्यांचा वेग वाढल्याने सर्वच गाड्या भरधाव येतात. पायी चालणारे व कंपन्यांमधून कामगारांना ने-आण करण्यासाठी बस व गाड्यांना रस्ता ओलांडावा लागतो. त्या वेळी वाहनचालकांसह शेतकरी, कामगारवर्गाला मोठी तारेवरची कसरत करावी लागते. रस्ता ओलांडताना अपघात घडत असल्याने त्वरित गतिरोधक टाकून झेब्रा क्रॉसिंग करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी, कामगार व वाहनचालकांनी केली आहे.
हेही वाचा: सावधान ! तालुक्यात कालबाह्य शीतपेयांची विक्री
''महामार्गावर पथदीप नसताना अपघाताच्या ठिकाणी बॅरिकेड्स तसेच ठेवले जातात. त्यामुळे होणाऱ्या अपघातांना जबाबदार कोण? केवळ वसुलीसाठी वाहनचालकांच्या जिवाशी खेळणे कितपत योग्य आहे.'' - सचिन खरजुल, वाहनचालक, इंदिरानगर, नाशिक
Web Title: Barricades On Nashik Mumbai Highway Causes Accident
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..