Education News : येत्या शैक्षणिक वर्षापासून मुलांच्या दप्तराचे ओझे कमी होणार! पुस्तकांत दिसणार हे बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

School Students

Education News : येत्या शैक्षणिक वर्षापासून मुलांच्या दप्तराचे ओझे कमी होणार! पुस्तकांत दिसणार हे बदल

इगतपुरी (जि. नाशिक) : शालेय मुलांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याच्या उद्देशाने शालेय शिक्षण विभागाने तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शालेय पाठयपुस्तकांत कोरे पाने जोडण्याचा सरसकट निर्णय घेतला होता.

मात्र आता त्यात बदल करत दुसरी ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची कोरी पाने जोडण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. (burden of childrens books will reduced from coming academic year nashik Educational News)

शिक्षण विभागाने आपल्या जुन्या निर्णयात बदल तर केलेच आहेत, याशिवाय पहिलीची पुस्तकेही चार विभागांत विभागली जाणार आहेत. यातही वह्यांची काही पाने जोडली जाणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे.

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पाठ्यपुस्तकांत कोरी पाने समाविष्ट करण्याची घोषणा गतवर्षी ऑक्टोबरमध्ये केली होती. त्यानंतर पुढील वर्षापासून त्याची अंमलबजावणीसाठी निर्णय जारी केला.

त्यानुसार राज्य शासनाच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांची पाने जोडलेली पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याबरोबरच खासगी आणि विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना नियमित पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

शालेय नोंदी करता येणार पाठ्यपुस्तकांना दिलेल्या प्रश्नपत्रिका सराव, वर्गपाठ, गृहपाठ यांसाठी वेगळ्या वह्या ठेवण्यास परवानगी राहील. नवीन पुस्तकांमध्ये प्रत्येक धडा, कविताच्या मागे दोन पाने जोडण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना महत्त्वाची नोंद या पानांमध्ये करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतंत्र वही घेण्याची गरज पडणार नाही. शाळेत जाताना केवळ पुस्तक घेऊन यावे लागणार आहे. घरचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेगळी वही ठेवण्याची मुभा मात्र देण्यात आली आहे. सरकारने अनुदान वाढवावे कोऱ्या पानांमुळे पाठ्यपुस्तकांची किंमत काहीशी वाढण्याची शक्यता असली तरी दप्तराचे वजन कमी होणार आहे हे महत्त्वाचे. पाठ्यपुस्तक मंडळाला थोडा खर्च जास्त करावा लागणार आहे. राज्य सरकारकडून ही पुस्तके तयार करण्यासाठी अनुदान मिळाले तर विद्यार्थ्यांना आहे त्या किमतीत पुस्तके पुरविणे मंडळाला शक्य होणार आहे.