येवला (जि. नाशिक) : जिल्ह्याच्या सीमेवरून जाताना प्रत्येक जण अत्यावश्यक सेवेचे कारण देतो… तर, काही जण नेते-लोकप्रतिनिधींच्या नावाखाली निघून जातात. त्यामुळे अडवणार कुणाला आणि दंड करणार कुणाला, अशी खंत एका पोलिसाने व्यक्त केली. जाणारे-येणारे विविध कारणे देत असल्यामुळे सोमवारीही औरंगाबाद व नगर जिल्ह्याच्या सीमेवर बिनधास्तपणे जाताना दिसले. नाही म्हणायला पोलिस विचारपूस करत होते, पण त्यांना नाइलाजाने सोडावेही लागत होते. (Citizens are traveling freely outside the district)
नाशिक जिल्ह्यातून नगर, पुण्याकडे जाताना येथील पिंपळगाव जलाल टोलनाक्यावर माल वाहतूक सोडून इतर वाहनधारकांना अडविले जाते. येथे दोन पोलिसांची पूर्णवेळ नियुक्ती असून, हे पोलिस प्रत्येकालाच कारणही विचारात असल्याचे दृश्य आजही दिसले. मात्र, प्रत्येकाकडे जिल्ह्याबाहेर प्रवासासाठी पास नसला तरी वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवेचे कारण असल्याने नाइलाजाने पोलिसांना त्यांना सोडून द्यावे लागत असल्याचेही चित्र दिसले. अशीच अवस्था औरंगाबादच्या सीमेवर वैजापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची होती. या ठिकाणीदेखील पोलिसांकडून गाड्यांची चौकशी होत असते. मात्र, विविध कारणे सांगितली जात असल्याने नाइलाजाने वाहने सोडून दिली जातात. काही अनावश्यक कारणे देत असल्याने अशांकडून दोनशे रुपयांची पावती फाडून दंड वसूल केला. अर्थात, या दोन्ही ठिकाणी पूर्वीप्रमाणेच पोलिसांची कारवाई ही मूडवरच अवलंबून असल्याचे दिसले. त्यामुळे अधूनमधून कारवाई आणि इतर वेळेस सुसाट प्रवास असे दृश्य कायम होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.