आदिमायेच्या चैत्रोत्सवावरही आता "कोरोना'चे सावट! रद्द झाल्यास सप्तशृंगगडाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे होणार..

saptshringi sunrays.jpg
saptshringi sunrays.jpg

नाशिक / मालेगाव : आदिमाया सप्तशृंगीदेवीचा चैत्रोत्सव रामनवमीपासून सुरू होत आहे. 2 ते 8 एप्रिलदरम्यान होणाऱ्या उत्सवावर या वर्षी कोरोना व्हायरसचे सावट आहे. त्यामुळे यात्रा होते की नाही, याबाबत साशंकता आहे.  उपजिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय होणार आहे. कोरोनाच्या फैलावामुळे राज्यभरातील यात्रा व इतर कार्यक्रम रद्द होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर सोमवारच्या बैठकीत चैत्रोत्सव रद्द करण्यात येण्याची शक्‍यता आहे. याची अनौपचारिक घोषणा बैठकीतच केली जाण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, उत्सव रद्द झाल्यास सप्तशृंगगडाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे होणार आहे. 

चैत्रोत्सवावर "कोरोना'चे सावट 

रामनवमीच्या मुहूर्तावर सप्तशृंगीचा चैत्रोत्सव सुरू होतो. दरवर्षी लाखो श्रद्धाळू पायी गडावर जातात. राज्यातील कानाकोपऱ्यातील श्रद्धाळूंसह मध्य प्रदेश व गुजरातमधील भाविकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो. किमान पाच लाख खानदेशवासीय पायी गडावर जात सप्तशृंगीपुढे नतमस्तक होतात. यात्रेकरूंच्या सेवेसाठी शिरपूर ते नांदुरीपर्यंतच्या रस्त्यावर शेकडो दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, मंडळे आदींकडून चहा, नाश्‍ता, जेवण, औषधांची व्यवस्था केली जाते. वर्षानुवर्षे सुरू असलेली ही परंपरा कायम ठेवण्याबरोबरच त्यात वर्षागणिक वाढ होत आहे. 

सप्तशृंगीचा गजर आठवडाभर
गेल्या वर्षी झालेला समाधानकारक पाऊस, तसेच दहावी, बारावीच्या संपलेल्या परीक्षा या काळात चैत्रोत्सव येत असल्याने नांदुरीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर सप्तशृंगीचा गजर आठवडाभर निनांदणार आहे. कोरोना व्हायरसमुळे राज्यभरातील यात्रा-जत्रा, उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम रद्द झाल्याने सप्तशृंगीचा चैत्रोत्सवाबाबत काय निर्णय होतो, याकडे भाविकांचे लक्ष लागून आहे. मिळालेल्या माहितीनुसार चैत्रोत्सव रद्द केला जाण्याचीच दाट शक्‍यता असून, त्याची अधिकृत घोषणा सोमवारी होऊ शकेल. उत्सव रद्द झाला, तर उत्सवातील सप्तशृंगीची पूजा-अर्चा, धार्मिक विधी पार पाडले जाणार आहेत. 


दहा कोटींची उलाढाल होणार ठप्प 
सप्तशृंगीचा चैत्रोत्सव कळवण-दिंडोरी तालुक्‍यांतील आदिवासी बांधवांसाठी दिवाळीसारखा सण असतो. चैत्रोत्सवाच्या पर्वणीत विविध व्यवसाय थाटून दोन पैसे कमविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. याखेरीज पायी वाटेवरील व्यावसायिक, उपहारगृहचालक आदींचीही चांगली कमाई होते. नांदुरी व सप्तशृंगगडावर लहान-मोठी हजारो दुकाने थाटली जातात. उत्सव रद्द झाल्यास हजारो व्यावसायिकांना याचा फटका बसेल. पायी यात्रेकरूंसोबत येणाऱ्या वाहनांची संख्या हजारांच्या वर असते. एसटी महामंडळाला मोठे उत्पन्न मिळते. उत्सव रद्द झाल्यास ट्रस्ट, ग्रामपंचायत, एसटी महामंडळ आदींच्या उत्पन्नावरही परिणाम होणार आहे. एकूणच किमान दहा कोटी रुपयांच्या उलाढालीला फटका बसू शकेल.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com