इगतपुरी (जि. नाशिक) : सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील नाशिक-इगतपुरी ते कसारा घाटदरम्यानच्या रस्त्यावर महिनाभरापासून होत असलेल्या पावसामुळे खड्डयांचे साम्राज्य पसरले असून, महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. याच मार्गावर अनेक खड्डे असून, या खड्ड्यांमुळे रोज अपघात होऊन अनेकजण जायबंदी होत आहेत.
घोटी येथील टोलनाका प्रशासन फक्त टोलवसुलीवर लक्ष केंद्रित करत असून, रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. टोल प्रशासन दुरुस्ती करीत नसेल, तर वाहनधारकांनी टोल का भरावा, असा सवाल उपस्थित होत आहे. (damaged road Mumbai Agra highway Potholes caused accident Nashik Latest Marathi News )
नाशिक-इगतपुरी-मुंबई महामार्गावरील बोरटेंभा ते इगतपुरी या रस्त्याची दर वर्षी दयनीय अवस्था होते. तीन-चार महिन्यांपूर्वीच येथे रस्त्याचे काम झाले होते. मात्र केवळ दोनच महिन्यांत या रस्त्याची पूर्णता: वाट लागली असून रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहने चालवणेही अवघड होत आहे.
हा रस्ता प्रचंड वर्दळीचा आहे. या रस्त्यावर अनेक वाहनांची वर्दळ सुरू असते. जनतेचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही रस्त्याचीं ही दुरावस्था पाहून, नागरिक व वाहनधारक संताप व्यक्त करीत आहेत.
विल्होळीपासून कसारा घाटदरम्यान एक ते दीड फुटापर्यंत खड्डे पडले आहेत.
यात सर्वांत जास्त खड्डे विल्होळी, गोंदे, मुंढेगाव, घोटी, बोरटेंभे, पिंप्रीसदो चौफुली, घाटनदेवी परिसरात आहेत. खड्ड्यातील पाण्यामुळे नेहमी अपघात होत असून रोज मनस्ताप होत आहे. तर काहींना जीव गमवावा लागत आहे. वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने टोलनाका प्रशासाने त्वरित रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.
रस्ता खड्ड्यात; टोलवसुली जोरात
नेमेचि येतो पावसाळा आणि महामार्गावर खड्यांचा रंकाळा या उक्तीप्रमाणे दर वर्षी पावसाळ्यात हा महामार्ग खराब होत असतो. याकाळात तात्पुरती डागडुजी करून वाहतूक सुरळीत करण्यात येते. त्यातच रस्ता कितीही खराब असला तरी टोलनाक्यावर वाहन येताच सक्तीने टोलवसुली केली जाते. वाहने चालतात म्हणून टोल देणे क्रमप्राप्त असले तरी ज्यासाठी टोल आकारला जातो, त्यासाठी सुविधासुद्धाही देण्यात याव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
"पंधरा ते वीस दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे मुंबई-आग्रा महामार्गाची दुरवस्था झाली आहे. यामुळे वाहनांचे नुकसान तर होतेच. शिवाय पाटदुखी, कंबरदुखी यासारखे आजारही उदभवत आहेत. तसेच रस्ता दुरुस्त होईपर्यत टोलसुद्धा देऊ वाटत नाही. महामार्गाची दुरुस्ती आवश्यक आहे." - मनोज पवार, वाहनधारक, इगतपुरी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.