Nashik News : आकडी येण्याचे जगभरातील लोकसंख्येच्या तुलनेत एक टक्का आहे, तर भारतामध्ये तीन कोटी रुग्ण हे आकडीने ग्रस्त आहेत. ग्रामीण भागामध्ये आजही आकडीच्या रुग्णांवर योग्य औषधोपचार होत नाहीत. त्यामुळे आजार बळावत जाऊन रुग्ण दगावण्याचीही शक्यता अधिक असते.
या आजाराबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती अभियान राबविण्याची आवश्यकता असून, योग्य उपचारांनी हा आजार ८० टक्के बरा होऊ शकतो, असे मत मुंबईतील इपिलेप्सी (आकडी/फीट) फाउंडेशनचे अध्यक्ष तथा न्युरोफिजिशिअन डॉ. निर्मल सूर्या यांनी व्यक्त केले. (Dr Nirmal Surya statement on Epilepsy Disease Misunderstanding in rural areas nashik news)
नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात इपिलेप्सी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यातील शंभरावे इपिलेप्सी निदान व उपचार शिबिराचे उद्घाटन डॉ. सूर्या यांच्या हस्ते झाले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी प्रास्ताविक केले.
डॉ. राहुल बाविस्कर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील राठोड, डॉ. अनंत पवार, डॉ. नीलेश पाटील, डॉ. प्रतीक भामरे आदी उपस्थित होते. शिबिरात जिल्हाभरातून आलेल्या ३१२ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
ग्रामीण भागातील आलेल्या रुग्णांच्या मेंदूची तपासणी करण्यात आली. काही रुग्णांनी आकडी आल्याच्या वेळचे मोबाईल व्हिडिओही डॉ. सूर्या यांना दाखविले. काही रुग्णांना डॉ. सूर्या यांनी त्यांच्या मुंबईतील रुग्णालयात पुढील उपचारासाठी बोलाविले.
डॉ. मनोज गुल्हाणे, डॉ. बी. एन. सावंत, डॉ. अभिषेक श्रीवास्तव, डॉ. तरल नागडा, डॉ. राहुल बाविस्कर, डॉ. मेहुल देसाई, डॉ. सुनील राठोड, डॉ. रोहन बोरसे, डॉ. अनंत पवार, डॉ. चंद्रकांत सुरवसे, डॉ. नीलेश जेजुरकर, डॉ. दिया माळवे, डॉ. सारिका वाघ, डॉ. कल्पना शिंदे उपस्थित होते.
ग्रामीण भागात चुकीच्या पद्धती
ग्रामीण भागात आजही आकडी आलेल्या रुग्णाबाबत गैरसमज आहेत. आकडी आल्यास ग्रामीण भागात कांदा वा चामड्याची चप्पल, बुटाचा वास दिला जातो.
ही अत्यंत चुकीची प्रथा, भ्रामक आहे. काही सेकंदामध्ये रुग्णाला शुद्ध येते आणि त्या उग्र वासामुळेच शुद्ध आली, असा भ्रम तयार करण्यात आलेला आहे. त्याचा आणि आकडीचा काडीचाही संबंध नसल्याचे डॉ. सूर्या सांगतात.
इलेक्ट्रिक ॲक्टिव्हिटीचा गुंता
आकडी येणे म्हणजे, मेंदूमध्ये सतत चालणाऱ्या इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटीमध्ये क्षणात काहीतरी बिघाड वा गुंता निर्माण होणे. अशा रुग्णांचा काही सेकंदांसाठी श्वास थांबतो. त्यानंतर काही क्षणात नियमित श्वास सुरू होऊन तो शुद्धीवर येतो.
यादरम्यान त्यास काहीही आठवत नाही. अशा रुग्णांवर तत्काळ उपचार होऊन औषधोपचार काही वर्षे केले तर त्यातून ८० टक्के रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे.
हेही वाचा :....इथं बनतो आपला लाडका तिरंगा
हे कारण असू शकते
आकडी येण्यामागे कारणात महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण भागात आजही घरीच बाळंतपण केले जाते. गुंतागुंतीचे बाळंतपण होणे, मातेच्या प्रकृतीची माहिती नसते, बाळंतपण झाल्यानंतर बऱ्याचदा नवजात बाळाचा श्वास थांबणे, यामुळे आकडी येण्याची शक्यता अधिक असते. नवजात बाळाची वाढ होत असताना त्याच्या मेंदूची सक्षमता वेळीच लक्षात न येण्यामुळे आकडीचे निदान होत नाही.
जनजागृतीची आवश्यकता
आधुनिक उपचारांमुळे आणि तत्काळ निदान व उपचार यामुळे आकडीचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. बाळंतपण हॉस्पिटलमध्येच होणे गरजेचे आहे.
याबाबत समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे नितांत गरजेचे आहे. त्यामुळे समाजातील आकडीबाबतचा गैरसमज दूर होऊन योग्य इलाज होऊन रुग्ण बरा होण्यास मदत होऊ शकेल.
"आकडी, फीट, मिरगी या नावांनी ओळखला जाणारा हा आजार मेंदूशी निगडित आहे. पहिल्यांदा जेव्हा फीट येते त्याचवेळीपासून उपचार मिळाले तर ८० टक्के रुग्ण बरे झाले आहेत.
आकडीवर मात करण्यासाठी समाजात जनजागृती गरजेची असून, त्यामुळे समाजातील गैरसमज दूर होऊन रुग्ण हॉस्पिटलपर्यंत येऊ शकतो."- डॉ. निर्मल सूर्या, न्युरोफिजिशियन
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.