
Water Crisis : किती वर्षे...आवर्तन अन् टँकरवर दिवस काढायचे; पाणीटंचाई येवलेकरांच्या मानगुटीवर
येवला (जि. नाशिक) : पालखेड कालव्याचे आवर्तन वेळेत येऊन साठवण तलाव भरला की शहराला तीन दिवसात पाणीपुरवठा होतो.
तसेच कितीही पाऊस पडला तरी फेब्रुवारी संपत आला की ग्रामीण (Rural) भागातील ४० ते ५० गावे-वस्त्यांवर टॅंकरने पाणीपुरवठ्याची वेळ येतेच..हे समीकरण आजकाल नव्हे तर वर्षानुवर्षे सुरू आहे. (even after heavy rainfall citizen facing water crisis nashik news)
यंदाही धो-धो पाऊस पडला खरा पण पाणीटंचाई येवलेकरांच्या मानगुटीवर बसली आहे. त्यामुळे टंचाईच्या फेऱ्यात आम्ही किती वर्ष काढायचे...असा सवाल सर्वसामान्य येवलेकर करू लागले आहे.
शहराला वर्षभर तीन दिवसाआड पाणी
ब्रिटिशकालीन दुष्काळी असलेल्या शहरासह तालुक्याची पाणीटंचाई नवी नाही. आजही राज्यातील टंचाईग्रस्त ९४ तालुक्याच्या यादीत येवल्याचे नाव अग्रभागी आहे. पाऊस पडला तर ठीक नाहीतर पावसाळ्यातही टँकरने पाणीपुरवठ्याची वेळ या तालुक्यावर आली आहे.
शहराचीही वेगळी परिस्थिती नसून टप्पा क्रमांक दोन पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत शहरासाठी वीस वर्षांपूर्वी ९० एकराचा साठवण तलाव केला आहे. मात्र यातील पाणीगळती कळीचा मुद्दा असून यामुळे अर्धे अधिक तळे झिरपले जाते. शहराला भर पावसाळ्यात वर्षभर तीन दिवसाआड पाणीपुरवठा होतो.
दररोजचे पाणी हे तर केवळ दिवास्वप्नच ठरले आहे. किंबहुना पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन लांबले तर चार ते पाच दिवसांनीही शहरवासीयांना पाणी मिळते. अनेकदा दररोजच्या पाणीपुरवठ्याचे आश्वासने नागरिकांना मिळाली पण अद्याप कृती नसल्याने हा सुदिन केव्हा उजाडेल याचे उत्तर कोणाकडेही नाही.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
टॅंकर तर पाचवीला पुजलेले
शहरापेक्षा गंभीर अवस्था ग्रामीण भागाची आहे. जिल्ह्यात कुठे असो वा नसो तालुक्यात प्रत्येक उन्हाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठ्याची वेळ येतेच. छगन भुजबळांमुळे ३८ गाव नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊन देशात आवळ ठरल्याने पन्नासवर गावांचा व संस्थांच्या पाणीटंचाईचा प्रश्न मिटला आहे.
पण अजूनही अनेक गावे तहानलेली आहेत. त्यामुळे ५० ते ७० गावे-वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठ्याची वेळ येतेच येते. इतर विकास झाला पण टंचाईतून मुक्तता होत नसल्याने येवलेकरांना या एकमेव विकासाची प्रतीक्षा आहे.
यंदा पावसाळ्यात धो-धो पाऊस पडला. किंबहुना पिके सडून कोट्यवधी रुपयांचे नुकसानही झाले. तालुक्याची पर्जन्याची सरासरी ४९३ मिलिमीटर असताना तब्बल ७२४ मिमी म्हणजेच १४० टक्के पाऊस यंदा पडला, तरीही पंचायत समितीच्या नियोजनानुसार यंदा ३५ गावे व १८ वाड्यांना यंदा पाणीटंचाईची झळ सहन करावी लागणार आहे.
कृतीआराखड्यात नियोजन
यंदा पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता असून प्रशासनाने संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकरने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. पाणी टंचाईशी मुकाबला करण्यासाठी संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार केला आहे.
तीन टप्प्यात असणाऱ्या या आराखड्यात ऑक्टोबर ते डिसेंबर व जानेवारी ते मार्च या दोन टप्प्यात तालुक्यात पाणी टंचाईची झळ जाणवणार नसल्याचे म्हटले आहे. तर एप्रिल ते जून या तिसऱ्या टप्प्यात मात्र ३५ गावे आणि १८ वाड्या वस्त्यांना पाणी टंचाई जाणवणार असल्याचे म्हटले आहे.
पाणीटंचाई जाणवणार
आहेरवाडी, जायदरे, लहीत, हडपसावरगाव, सोमठाणजोश, अनकाई, वसंतनगर, ममदापूर, खामगाव, भुलेगाव, पांजरवाडी, गारखेडे, आडसुरेगाव, नायगव्हाण, कौटखेडा, कोळम बुद्रुक, कोळम खुर्द, रहाडी, वाघाळे, कोळगाव, वाईबोथी, पन्हाळसाठे, न्याहारखेडे, बदापूर, धनकवाडी, रायते, रेंडाळे, खरवंडी, देवदरी, चांदगाव, गणेशपुर, देवठाण, धामणगाव,
गोरखनगर, खैरगव्हाण गावांना एप्रिल ते जून दरम्यान पाणी टंचाई जाणवणार आहे. या बरोबरच १८ वस्त्यांना तिसऱ्या टप्प्यात पाणी टंचाईची झळ जाणवणार आहे. संभाव्य पाणी टंचाई जाणवणारी ही सर्व गावे, वाड्यावस्त्या पूर्व भागातील आहेत. उपाययोजना म्हणून यंदा या गावांना केवळ टँकरने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे. तर पाणी पुरवठ्यासाठी १५ टँकर लागणार आहेत.
तर होईल टँकरमुक्ती!
पूर्व भागातील गावे टँकरमुक्त करण्यासाठी सध्या ४१ गावांची पाणी योजना मंजुरीच्या टप्प्यात आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यास राजापूर, ममदापूरसह अवर्षणप्रवण भागातील गावांना नळाद्वारे पाणी मिळणार आहे. परिणामी टँकर मुक्त तालुक्याचे स्वप्न होऊ शकेल.