विहिरींच्या उपशाने पळाले तोंडचे पाणी! येवल्याच्या उत्तर-पूर्व भागात पीक टंचाईच्या फेऱ्यात 

Excessive use of water from wells can lead to water scarcity in crops
Excessive use of water from wells can lead to water scarcity in crops

येवला (जि. नाशिक)  : सुरवातीला गरजेपुरता तर शेवटी धो-धो पडणाऱ्या पावसाने खरिपाच्या पिकांची वाताहत केली खरी. धो-धो पाऊस पडला आणि वाहून गेल्याने अवर्षणप्रवण उत्तर-पूर्व भागात टंचाईने डोके वर काढले आहे.

जोरदार पाऊस झाला म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बीची पिके घेतली. पण आता अचानक विहिरींचा उपसा होऊन त्या कोरड्या होऊ लागल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे शेतातील गहू-हरभऱ्यासह कांद्याला पाणीटंचाईचा फटका बसून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. 

यंदा पावसाने जोरदार हजेरी लावली पण..

तालुक्यात ८२२ मिलिमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली असून, यंदाही जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे समाधान केले आहे. सरासरीच्या दीडपट पाऊस झाल्याने अद्याप टंचाई जाणवत नव्हती. किंबहुना पालखेडच्या आवर्तनाची गरज भासलेली नसून सर्वत्र आनंदही आनंद आहे, असे वाटत होते. मात्र चार दिवसांपासून डोंगराळी उत्तर पूर्व भागात अचानक विहिरींचा उपसा होऊ लागला आहे. या भागातही यंदा पावसाने जोरदार हजेरी लावत बंधारे तुडुंब भरले होते. मात्र दर वर्षी सरतेशेवटी पडणारा भिजपाऊस जमिनीची भूजल पातळी वाढून पाणी फेब्रुवारीपर्यंत पुरते. तरी या वेळी मुसळधार पावसामुळे पाणी वाहून गेल्याची स्थिती आहे. यामुळे भूजल पातळी खालावलेली राहिली. परिणामी बंधाऱ्यांनी तळ गाठला असून, अनेक विहिरी, कूपनलिकांचा उपसा होऊ लागला आहे. 

शेतकरी धास्तावले...

मुळात या भागात फेब्रुवारीनंतर पाण्याचा प्रश्न गंभीर बनतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आगाद पिके घेतली असून, सध्या या भागातील गहू शेवटच्या टप्प्यात असून, रब्बी रांगडे कांदेही चांगल्या स्थितीत आहेत. अजून गव्हाला एक-दोन, तर कांद्याला दोन-चार पाण्याची गरज आहे. त्यातच पाणी आटल्याने शेतकऱ्यांपुढे गहन प्रश्न उभा राहिला आहे. आतापर्यंत या पिकांसाठी मोठे भांडवल गुंतून शेतकऱ्यांनी पिके उभी केली. ती जोमाने येतील, असा आशावाद असल्याने भरमसाट खर्चही केला. इतके दिवस थंडी पडत नसल्याने पिके जोम धरत नव्हती, आता पिके जोरात असतानाच पाणीटंचाई जाणवू लागल्याने शेतकरी धास्तावले आहेत. काही शेतकऱ्यांनी, तर कांद्याचे पीक काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी असलेल्या शेजारीपाजारींकडून पाणी विकत घेण्याचीही तयारी चालवली आहे. तसेच शेततळे असलेल्या शेतकऱ्यांना मात्र अद्याप तरी त्यांच्या चिंता जाणवत नसून डिसेंबरमध्येच पाणी आटू लागल्याने फेब्रुवारीपूर्वीच हा परिसर भकास होईल, असा अंदाज आहे. 

डोंगरगाव, कोळगाव परिसराला ‘नो टेन्शन’ 

राजापूर, ममदापूरसह या भागातील २०-२५ गावांना कालव्याचा लाभ, तर नाहीच; पण हक्काचे बंधारे, तलावही नसल्याने टंचाईने डोके वर काढण्यास लवकरच सुरवात केली आहे. याउलट याच भागातील डोंगरगाव पाझर तलाव, कोळगावचा बंधारा यंदा तुडुंब भरल्याने अद्यापही मुबलक पाणी आहे. त्यामुळे याच्या लाभक्षेत्रात पाणीदार स्थिती आहे. या भागात घेतलेली पिके निघेपर्यंत पाणी पुरेल, असे शेतकरी सांगतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com