डोळ्यात तेल घालून कांद्याची राखण! वाढत्या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती 

onion seed.jpg
onion seed.jpg

गिलाणे ( जि. नाशिक) : एकीकडे कांद्याचे बाजारभाव वाढल्याने खुशीत असलेल्या शेतकऱ्यांना बोचरी थंडी अंगावर झेलत रात्रभर कांद्याची राखण करावी लागत आहे. कसमादे पट्ट्यात कांदाचोरीच्या घटना वाढल्या असून, शिल्लक कांदा सांभाळून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी चाळीजवळच डेरा टाकला आहे. डोळ्यांत तेल घालून कांद्याची राखण केली जात आहे. 

५० टक्के कांदा सडल्याने भाव वाढले

कांद्याला आतापर्यंतचा उच्चांकी भाव मिळाला आहे. किरकोळ बाजारात शंभरीच्या आसपास कांदा विकला जात असून, हे दर अजून वाढण्याचा अंदाज जाणकारांकडून वर्तविला जात आहे. त्यामुळे कांद्याला सोन्याचा भाव आला आहे. त्यात परतीच्या पावसामुळे ५० टक्के कांदा सडल्याने भाव वाढल्याचे बोलले जात आहे. कांद्याचे भाव वाढल्याने कांदाचोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतात आजूबाजूला असलेल्या चाळीतील कांदा रात्रीच्या वेळी चोरून नेणे चोरट्यांना सहज शक्य होते. त्यामुळे कांदा उत्पादक बळीराजा धास्तावला आहे. कसमादे पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांचा कांदा चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, तर काही ठिकाणी खोडसाळपणे कांदाचाळीत यूरिया टाकून कांदा खराब करण्याचे गैरकृत्य काही समाजकंटक करताना दिसत आहेत. 

कांद्याची राखण करण्याची वेळ

मुळातच सध्या खूपच थोडा कांदा शिल्लक असून, शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री चाळीमध्ये साठविलेल्या कांद्याची राखण करण्याची वेळ आली आहे. अनेक दिवसांनी कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे चाळीमध्ये कांदा शिल्लक आहे त्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे; परंतु चाळीमध्ये असलेला कांदा चोरी होतो की काय याची चिंता शेतकऱ्यांमध्ये आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com