सातपूर (नाशिक) : अहमदनगर जिल्ह्यातील महर्षी नागवडे श्रीगोंदा साखर कारखान्यातील साडेचार हजार टन मळीची टाकी अचानक फुटल्याने आजूबाजूच्या शेकडो एकरवर ही मळी पसरली आहे. तसेच कारखान्यातील यंत्रणांमध्ये ही मळी घुसल्याने शेतकऱ्यांसह कारखान्याचे करोडोंचे नुकसान झाले आहे.
कारखाना बंद करण्याचे आदेश
श्रीगोंदा साखर कारखान्याची मळीची टाकी फुटल्याने साडेचार हजार टन मळी परिसरातील शेकडो एकर शेतात व कारखान्यांत घुसली. याचबरोबर परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून परिसरातील शेतीसह नागरी वस्तीला प्रदुषणाचा धोका निर्माण झाला आहे. या सर्व गंभीर बाबी लक्षात घेत MPCB नाशिक विभागीय कार्यालयाने कारखाना बंद करण्याचे आदेश दिले आहे.
अबब! दोनशे ट्रक भरतील एव्हढी मळी रस्त्यावर
साडेचार टन मळी वाहून नेण्यासाठी किमान दोनशे ट्रक लागले असते. एवढ्या मोठ्या प्रमाणातील मळीची टाकी फुटल्यानंतर काय परिस्थिती झाली असेल याचा अंदाज आपण यावरून लावू शकतो. यातील लाखो लिटर मळी कारखान्याला लागून असलेल्या नाल्यात वाहुन गेली आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून मळीच्या घातक वासामुळे नागरी लोकवस्तीला तसेच कारखान्यातील कर्मचारी व कामगारांनाही याचा धोका निर्माण झाला आहे.
दुर्घटनेचे नेमके कारण काय...?
या बाबत काही नागरिकांनी जिल्हा सरकारी यंत्रणांबरोबर थेट मंत्रालयात तसेच नाशिक विभागातील औद्योगिक सुरक्षा कामगार उपायुक्त (MPCB) आदी कार्यालयांवर धाव घेतल्याने काल जिल्हा यंत्रणांसोबत मुबंई व नाशिक MPCBच्या अधिकाऱ्यांंनी घटना स्थळी दाखल होत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पर्यावरणातील व नागरी लोकवस्ती बरोबर कारखान्यातील अधिकारी कर्मचारी तसेच कामगारांच्या जिवाचा धोका लक्षात घेऊन या कारखान्याचे उत्पादन बंद करण्याचा आदेश MPCBने दिले आहेत. नेमकी आग कशामुळे लागली या बाबत औद्योगिक सुरक्षा विभागाचे पथक आज घटनास्थळी रवाना झाले असून, या पथकाच्या पाहणीनंतर टाकी नेमकी कशामुळे फुटली व किती कोटींचे नुकसान झाले ते कळणार आहे.
''गेल्या अनेक महिन्यांपासून संबंधित यंत्रणा तसेच मंत्रालय व जिल्हा प्रशासनाला या कारखान्यातील गैरप्रकाराबाबत तक्रार केली आहे; परंतु कुठलीही कारवाई झाली नाही. शेवटी इच्छामरणाची मागणी केल्यानंतर शासन यंत्रणेने पाहणी केली आणि दुसऱ्याच दिवशी टाकी फुटून दुर्घटना घडली. आता यंत्रणेला जाग यावी, हीच अपेक्षा.'' - करीम जहागीर शेख, तक्रारदार, श्रीगोंदा
''बुधवारी सकाळी अचानक टाकी फुटल्याने ही दुर्घटना झाली आहे. या बाबत युद्ध पातळीवर उपायोजना करण्याचा प्रयत्न केला जात आहे'' - रमाकांत नाईक एम.डी. श्रीगोंदा साखर कारखाना.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.