Nashik Protest News : गेल्या २० दिवसांपासून संपावर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तात्पुरत्या (कंत्राटी) ३७२ हून अधिक कर्मचाऱ्यांनी बुधवारी (ता. २४) बॅंकेत धडक देत प्रशासकांसमोर ठिय्या आंदोलन केले. तब्बल चार तास सुरू असलेल्या या आंदोलनानंतर बॅंकेचे माजी संचालक तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीषकुमार कोतवाल यांनी मध्यस्थी करत प्रशासक व आंदोलनकर्त्यांची बैठक घडवून आणली. (Contract employees protest in front of district bank administrator )
या बैठकीत बॅंक प्रशासनाने मागण्यांबाबत कोणतेही ठोस आश्वासन न देता कायम करण्याबाबतचा प्रस्ताव सहकार विभाग, वरिष्ठांकडे पाठविण्याचे तसेच संप काळातील रजा बिनपगारी करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सायंकाळी आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतल्याचे सांगितले जात आहे. जिल्हा बॅंकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी ५ एप्रिलपासून संप पुकारला आहे.
तात्पुरत्या सेवकांना कायम करावे, वेतनवाढ द्यावी, मेडिक्लेम सुविधा लागू करावी, नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही रजा व सुविधा लागू कराव्यात या कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. संपावर जाऊन २० दिवसांचा कालावधी उलटूनही जिल्हा बॅंक प्रशासनाकडून यावर तोडगा काढलेला नाही. यातच, बॅंकेतर्फे कर्मचाऱ्यांना नोटिसा बजाविण्यात आल्याने आक्रमक झालेल्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी जिल्हा बॅंकेवर धडक मारली.
संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी प्रशासकांशी दालनात चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सभागृहात बैठक घेण्याची मागणी केली. यातच जिल्हाध्यक्ष कोतवाल दाखल झाले. त्यांनी सभागृहात बैठक घेतली. बैठकीत कर्मचाऱ्यांनी कायम करण्यांसह वेतनवाढीची मागणी केली. त्यावर, प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी मागण्याबाबत कायदेशीर अडचणी असून, बॅंकेचा परवानाहीदेखील अडचणीत असल्याचे सांगितले. (latest marathi news)
मागण्यांबाबत वरिष्ठ पातळीवर सकारात्मक चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, अशी भूमिका मांडली. मात्र, कर्मचाऱ्यांनी ही भूमिका मान्य न करता आंदोलनावर ठाम राहिले. कोतवाल यांनी बॅंक प्रशासनाच्या हातात असलेल्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी केली. मात्र, त्यातील अडचणी लक्षात आणून दिल्या. यात, एका कर्मचाऱ्याने प्रशासकांना खडेबोल सुनावले.
त्यावर संतप्त झालेले प्रशासक चव्हाण बैठकीतून बाहेर पडले. त्यानंतर कोतवाल यांनी प्रशासक चव्हाण यांच्याशी चर्चा करत, पाच कर्मचाऱ्यांच्या समितीसमवेत चर्चा घडवून आणली. बंद दरवाजाआड तब्बल दोन तास ही चर्चा सुरू होती. यात, कायम करणे, वेतनवाढ यासाठी नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे निश्चित झाले.
त्यानुसार हा प्रस्ताव सादर करावा तसेच संपकाळातील सर्व रजा बिनपगारी करण्याचे आश्वासन या वेळी देण्यात आले. यानंतर काही कर्मचाऱ्यांनी संपावर कायम असल्याचे सांगितले. सायंकाळी उशिरा आंदोलन मागे घेतल्याचे कर्मचारी वर्गाकडून सागंण्यात आले.
''ही कर्मचारी भरती प्रक्रिया २०१६ मध्ये झाली आहे. जिल्हा बॅंकेची आर्थिक परिस्थिती अडचणीची आहे. मागण्या पूर्ण करण्याबाबत कायदेशीर अडचणी आहेत, असे असतानाही मागण्यांबाबतचा नव्याने प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविला जाणार आहे. शासनाकडून आलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही केली जाईल.''- प्रतापसिंह चव्हाण, प्रशासक, जिल्हा बॅंक
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.