Nashik : तीन सदस्यांचे पॅनल तयार करण्याच्या हालचाली गतिमान

निवडणुकीत रंग भरण्यास सुरवात; तयारीला वेग
nashik muncipal corporation
nashik muncipal corporationsakal

नाशिक : पुढील वर्षाच्या प्रारंभी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांसाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या त्रिसदस्यीय प्रभाग रचनेत आता कुठलाच बदल होणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल्यानंतर आता इच्छुकांकडून निवडणुकीच्या तयारीला सुरवात झाली आहे. महिला व राजकीय आरक्षणासह तीन सदस्यांचे पॅनेल तयार करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून, राज्यपालांकडून त्रिसदस्यीय रचनेवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर निवडणुकीत रंग भरण्यास सुरवात होईल.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपने यापूर्वी अमलात आणलेली बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करून मुंबईच्या धर्तीवर एक सदस्यीय प्रभाग पद्धती अमलात आणण्याचा कायदा करण्यात आला. परंतु, यावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद निर्माण झाले. राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे व पिंपरी- चिंचवडसाठी दोन सदस्यीय प्रभाग रचना हवी होती. परंतु, एक सदस्यीय प्रभाग रचनेचा कायदा केल्याने त्यात बदल करण्यासाठी विधी मंडळाचे अधिवेशन बोलवावे लागणार होते. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी एक सदस्यीय रचनेनुसार कच्चा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्याने व येत्या काळात अधिवेशन न होण्याची कुठलीच शक्यता नसल्याने २२ सप्टेंबरला त्रिसदस्यीय प्रभाग रचनेला मंजुरी देण्यात आली.

परंतु, महाविकास आघाडी मधील काँग्रेसने दोन सदस्यांच्या प्रभागाचा आग्रह धरल्याने पुन्हा प्रभाग रचनेत बदलाची शक्यता व्यक्त केली जात होती. २८ सप्टेंबरच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत द्विसदस्यीय प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब होईल, असे बोलले जात होते. परंतु, बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्रिसदस्यीय प्रभाग रचनाच राहणार असल्याचे स्पष्टीकरण दिल्यानंतर आता राज्यपालांकडून या रचनेवर शिक्कामोर्तब होण्याकडे लक्ष लागले आहे. राज्यपालांच्या मंजुरी नंतर त्रिसदस्यीय रचनेचे कायद्यात रूपांतर होईल. दरम्यान, त्रिसदस्यीय रचनेवर शिक्कामोर्तब झाल्याने पॅनेल तयार करण्याच्या प्रक्रियेला राजकीय पातळीवर गती आली आहे.

लोकसंख्या २०११ ची हद्द बदलणार

प्रभागरचना करताना २०११ च्या लोकसंख्येचा विचार केला जाणार आहे, तर २००२ व सन २००७ च्या महापालिका निवडणुकीत त्रिसदस्यीय प्रभाग रचना असल्याने त्यानुसारच प्रभाग रचनेचा आराखडा तयार केले जाणार असले तरी लोकसंख्येनुसार ब्लॉक तयार करावे लागणार असल्याने प्रभागांच्या हद्दी मात्र बदलणार आहे. २०११ च्या जनगणनेनुसार त्रिसदस्यीय प्रभागरचना होणार असल्याने त्यासाठी सुमारे ३२ ते ३५ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com