Nashik News : निवडणुकीत पैसेवाटपाच्या आरोपावरून महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जुंपली. महायुती व मित्रपक्षांकडून मोठ्या निवडणुकीत पैशांचे वाटप सुरू आहे. बारामती, अहमदनगरनंतर आता नाशिकमध्ये महायुती पैशांचे वाटप करीत आहे. महायुती राज्यात निवडणुकीत दोन हजार कोटी रुपये खर्च करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. (MLA Rohit Pawar has alleged that grand alliance is spending Rs 2000 crores in elections)
त्याबाबतचे अनुभव दोन टप्प्यांतील निवडणुकांमध्ये दिसून आले. बारामतीत १५० कोटी खर्च करण्यात आले; तर अगदी पोलिस व्हॅन, रुग्णवाहिका, टॅंकरमधून पैसा आणल्याचाही दावा त्यांनी या वेळी केला. मंगळवारी (ता. १४) प्रचार दौऱ्यानिमित्त नाशिकमध्ये आलेले आमदार पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पवार म्हणाले, की अहमदनगर लोकसभा मतदारसंघात उन्हाळ्यातही पैशांची धुवांधार बरसात झाली आहे. या संदर्भात एका पोस्टच्या माध्यमातून एक व्हिडिओही पोस्ट केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री नाशिकमध्ये आले असताना त्यांनी पैशांच्या बॅगा भरून आणल्याच्या आरोपावर बोलताना पवार म्हणाले, की मुख्यमंत्री मुक्कामी राहणार नव्हते.
आता फाईली सही करू शकत नाहीत. असे असताना नऊ बॅगा कशासाठी, हा प्रश्न उपस्थित होतो. नाशिक आणि दिंडोरीचे महाविकास आघाडीचे उमेदवार सामान्य आहेत. महायुतीचे उमेदवार बलाढ्य आहेत. त्यामुळे नाशिक, दिंडोरीतही पैशांचे वाटप होईल, असे त्यांनी सांगितले. खासदार राऊत यांच्या ८०० कोटींच्या भूसंपादन घोटाळ्यावर बोलताना त्यांनी दोन वर्षांत सरकारने हजारो कोटींचा घोटाळा केला आहे. (latest marathi news)
आम्ही सत्तेत आल्यावर अँटी करप्शन मोहीम हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष आहे. शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जायला त्यांना भीती वाटते. सामान्य माणूस धडा शिकवेल, ही भीती भाजपला आहे. त्यामुळे नाशिकमधील मोदी यांच्या सभेची जागा बदलली जात असल्याचे पवार यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेस आमदार सुनील भुसारा, माजी आमदार मारोतराव पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे, छबू नागरे, दीपक वाघ आदी उपस्थित होते.
मतदानाचा टक्का घसरला
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच विचारांचा आता फुगा फुटला आहे. फडणवीस यांनी जे राजकारण केले, ते लोकांना आवडले नाही. सामान्य लोकांचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यात मतदान झाले नाही.
भाजपचे मतदार बाहेर न निघाल्याने मताचा टक्का घसरला आहे. मोदी यांच्या अंध भक्तांना तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही. परिणामी, याचा फायदा महाविकास आघाडीला होणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
राज्यात महायुतीला १६ ते १८ जागा
महाराष्ट्रात महायुतीला किती जागा मिळणार, यावर रोहित पवार यांनी भाष्य केले. भारतीय जनता पक्षाला १३ ते १४ जागा, शिवसेना शिंदे गटाला दोन ते तीन जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही. यामुळे एकूण महायुतीला राज्यात १६ ते १८ जागा मिळतील, असा दावा पवार यांनी केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.