
सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळस्थान समजल्या जाणाऱ्या कावनई गावाला ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभला आहे. गावातील ग्रामदेवता असलेल्या कामाक्षीमाता मंदिराजवळ महामुनी कपिलमुनीच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी ‘कपिलधारा तीर्थ’ या नावाने ओळखली जाते.
ब्रिटिश काळापासून कावनईची विशेष अशी ओळख आहे. ब्रिटिश काळात कावनई हा तालुका होता, अशी माहिती जाणकार आजही देतात. ब्रिटिश काळापासून ओळख असली तरीही कावनई गावाला फार जुना धार्मिक वारसा आहे. (navratri special article about kavnai kamakshi mata nashik)
याबाबत गावात उपलब्ध असलेल्या खुणा, गावातील पुरातन मंदिर, किल्ले, कपिलधारातीर्थवरून या गोष्टी स्पष्ट होतात. गावातील कामाक्षीमाता या जागृत भगवतीच्या देवस्थानात नवरात्रीत भाविकांची मोठ्या प्रमाणात मांदियाळी असते. ‘जागृत देवस्थान’ आणि ‘नवसाला पावणारी’ अशी या देवीची ओळख आहे.
कामाक्षीमातेची तशी जुनी ओळख आहे. तसे महात्म्यसुद्धा वेगळे व अलौकिक असे आहे. कावनई येथील कामाक्षीदेवीचे मंदिर पौराणिक महात्म्य लाभलेले भारतातील चार शक्तिपीठांपैकी तिसऱ्या क्रमांकाचे शक्तिपीठ आहे. भारतात कांचीपरा, गुवाहटी, श्रीक्षेत्र कावनई आणि करंजगाव (शेगाव) ही चार शाक्तिपीठे आहेत.
रामायण काळापासून ओळख
रामायण काळात श्रीराम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधासाठी जात असताना इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथे पक्षीराज जटायू जखमी अवस्थेत मिळून आले. तेव्हा या जटायूचा उद्धार करून प्रभू श्रीराम दंडकारण्यात सीतेचा शोध घेत आले.
त्याच वेळी कैलास पर्वतावर श्री शंकराचा ‘श्रीराम’ हा जप सुरू असताना पार्वतीमाता शंकरास म्हणाली ‘जो राम आपल्या पत्नीचा सांभाळ करू शकत नाही, त्याचं ध्यान तुम्ही का करता’ या वेळी शंकराने उत्तर दिले ‘जो विचार तू करतेस, तो चुकीचा आहे, तू रामाची परीक्षा घेऊ शकतेस’ त्या वेळी या दंडकारण्यात पार्वतीमाता सीतेच्या रूपात येऊन रामाला मोहित करू लागली.
श्रीरामाने पार्वतीमातेला ओळखून दंडवत घातला. पार्वतीमाता प्रसन्न होऊन कैलास पर्वतावर परतू लागली, तेव्हा माझ्यासाठी आपण इथेच राहावे, असा हट्ट श्रीरामाने धरला. पार्वतीमाता या ठिकाणी कामाक्षीमातेच्या रूपाने राहिली. ‘रामाची कामेच्छा बघण्यासाठी आलेली ही कामाक्षीमाता’ असा वाल्मीकी रामायणात उल्लेख आढळतो.
असा झाला जीर्णोद्धार
कावनईच्या कामाक्षीमातेच्या मंदिराचा जीर्णोद्धाराचा इतिहाससुद्धा रंजकच आहे. या मंदिराचा इ. स. १७५० ते १७६५ या कालखंडात जीर्णोद्धार झाला. एका महत्त्वाच्या युद्धात विजयश्री खेचून आणल्यानंतर पेशव्यांनी नवसपूर्तीसाठी देवीला सोन्या-चांदीचे अलंकार चढवून मोठ्या भक्तिभावाने मंदिराचा जीर्णोद्धार केला.
(शब्दांकन : विजय पगारे, इगतपुरी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.