
Onion Crisis : खड्डा खोदून शेतात पुरला कांदा; पाणावलेल्या डोळ्यादेखत दिली मूठमाती
Onion Crisis : अवकाळी पावसात फटका बसलेला चाळीतील ३५ ट्रॉली कांदा खराब झाल्याने दह्याणे (पाळे) (ता. कळवण) येथील शेतकरी योगेश पाटील यांच्यावर शेतातच जेसीबीच्या साहाय्याने २० फूट खोल खड्डा खोदून त्यात खराब कांदा पुरण्याची नामुष्की ओढवली.
दिवसरात्र मेहनत घेऊन, खर्च करून साठविलेल्या कांद्यावर जड अंतःकरणाने माती ओतावी लागली. (Onion buried in field by digging pit nashik news)
कसमादे हा पट्टा जिल्ह्यात कांदा उत्पादनासाठी अग्रेसर मानला जातो. मात्र चालू हंगामात कांदा उत्पादकांना पहिल्यांदा भयानक परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आली.कांद्याचे बी टाकण्यापासूनच वातावरणाने वेळोवेळी रंग बदलत संकटांची मालिका कांदे शेतातून काढण्यापर्यंत चालूच ठेवली.
यात अवकाळी पाऊस, गारपीट, विविध रोगांचा प्रादुर्भाव अशा सर्व संकटातही शेतकऱ्यांनी हिम्मत न सोडता काबाडकष्ट करून कांद्याचे पीक घेऊन चाळीत साठविला. मात्र वातावरणाच्या फटक्याने संपूर्ण कांदा खराब झाला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अजूनही २५ ते ३० ट्रॉली कांदा जमिनीत पुरावा लागणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. परिसरातील बहुतांश साठविलेल्या कांद्याची हीच परिस्थिती आहे. शिवाय जो चांगल्या प्रतीचा कांदा आहे. त्याला बाजारात कवडीमोल भाव असल्याने, माल विक्रीचे वाहतूक भाडेही सुटत नसल्याने, शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
फक्त कांद्याच्याच बाबतीत ही शोकांतिका नाही तर टोमॅटो, मिरची यांना देखील बाजारभाव नसल्याने हा संपूर्ण हंगामच शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार ठरला आहे.
"दिवसरात्र प्रचंड कष्ट, खर्च करून, चाळीत साठविलेला कांदा, शेतात खड्डा करून पुरताना मनाला प्रचंड वेदना झाल्या. मात्र काहीच निष्पन्न झाले नाही. शासनाने शेतकऱ्यांचा कैवार घेऊन, नुकसान भरपाई दिली पाहिजे. तसेच शेतमालाला योग्य भाव देऊन शेतकऱ्याला जगविले पाहिजे." -योगेश पाटील, कांदा उत्पादक, दह्याणे (पाळे)