
Nashik News : ओव्हरलोडिंग वाहने मोकाटच! प्रकल्पाच्या नावाखाली गौण खनिजाची नियमबाह्य वाहतूक
सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम गेल्या तीन वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरू आहे. या कामासाठी नेमण्यात आलेल्या ठेकेदार कंपनीवर प्रशासन मेहरबान असल्याचे चित्र सुरवातीपासून आहे.
कंपनीकडून रस्ते काम बांधकामासाठी आवश्यक गौण खनिजांच्या वाहतुकीसाठी तालुक्यातील अर्ध्या अधिक रस्ते वापरत आणले गेले. या रस्त्यांची पुरती वाट लागली असून त्याच्या दुरुस्तीकडे बघायला कोणाला वेळ नाही.
कंपनीच्या ओव्हरलोडींग धावणाऱ्या वाहनांवर कुणाचेच नियंत्रण राहिले नसल्याचे चित्र आहे. सरकारी प्रकल्पाच्या नावाखाली गौण खनिजाची नियमबाह्य वाहतूक करण्यात येत असल्याचे चित्र आहे. (Overloading vehicles for free Illegal transportation of minor minerals under name of project Nashik News)
एरवी सर्वसामान्यांचे वाहने अडवून दंडात्मक कारवाई करणाऱ्या परिवहन विभाग, पोलिस विभागाला शिर्डी महामार्गावरून धावणारी ठेकेदाराची ओव्हर लोडिंग वाहने दिसत नाही काय हा प्रश्न उपस्थित होत आहे.
महसूल यंत्रणांचे देखील याकडे सपशेल दुर्लक्ष झाले आहे. गौण खनिज वाहतुकीचा परवाना अटींच्या अधीन राहूनच दिला असला तरी नियम धाब्यावर बसवत धावणारी वाहने पाहता पाणी कुठे मुरते याचा सामान्यांना अंदाज येतो.
पाथरे गावाजवळ नुकत्याच झालेल्या अपघातानंतर कंपनीच्या व एकूणच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीबाबत अनेक प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित करण्यात आले. मात्र आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही.
ओव्हरलोडींग धावणारी वाहने व रात्रंदिवस सुरू असलेली गौण खनिजाची नियमबाह्य वाहतूक हे कळीचे मुद्दे आहेत. आरटीओ, पोलिस आणि महसूल यंत्रणेच्या डोळ्यादेखत वाहने धावत असताना कुणीही त्याचा जाब विचारायला तयार नाही.
दरम्यान विनाकारवाई ही वाहने सोडून देण्यासाठी दबाव आणला जातो अशी माहिती परिवहन विभागातील एका अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.
"ओव्हरलोडिंग वाहनांवर कारवाईचा अधिकार आरटीओकडे तर महसुली यंत्रणा अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात मोहीम राबवते. संबंधित कंपनीच्या विनापरवाना गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर यापूर्वी अनेकदा दंडात्मक कारवाया झाल्या आहेत. नागरिकांनी थेट माहिती द्यावी. गौण खनिज वाहतूक करणाऱ्या व ओव्हरलोड धावणाऱ्या वाहनांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल." - एकनाथ बंगाळे, तहसीलदार, सिन्नर
रस्त्यांच्या नशिबी वनवासच
समृद्धी महामार्गाच्या कामावेळी देखील तालुक्यातील बहुसंख्य गावातील रस्त्यांची वाट लागली आहे. खराब झालेले हे रस्ते नव्याने बांधून दिले जातील असे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात आले होते.
लोकप्रतिनिधीही याच पद्धतीने लोकांना सांगायचे. मात्र आता समृद्धी महामार्गाचे काम उरकले असून ग्रामीण भागातील त्या रस्त्यांच्या नशिबी अद्यापही वनवास आहे. खड्डे चुकवत आणि ठेचा खात या रस्त्यांवरून ग्रामीण जनतेला मार्गक्रमण करावे लागत आहे. ओव्हरलोडींग वाहनांमुळेच या रस्त्यांची वाट लागली आहे.
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
हा भेदभाव कशासाठी?
साधारणपणे दहा चाकी हायवा ट्रकची माल वाहतूक क्षमता ही 16 टन पर्यत असते. प्रत्यक्षात मात्र 22 ते 25 टन मालाची वाहतूक करण्यात येते. शासनाचा गौण खनिज वाहतुकीसाठीचा नियम याच वाहनासाठी साडेतीन ब्रास इतका आहे.
प्रत्यक्षात वाहतूक मात्र दुप्पट क्षमतेने म्हणजेच सात ब्रास पेक्षा अधिक करण्यात येते. शिर्डी महामार्गाच्या कामावर धावणाऱ्या अशा कोणत्याही वाहनाची क्षमता तपासल्यास कंपनीकडून होणारी धूळफेक आणि प्रशासनाकडून करण्यात येणारी पाठराखण उघडकीस येईल.