Nashik News : शहरातील जुना मुंबई- आग्रा महामार्ग केवळ तीन किलो मीटरच्या अंतरात असंख्य खड्डे तयार झाले आहेत. गेल्या पाच वर्षांपासून या खड्डेमय रस्त्याच्या दुरुस्तीला मुहूर्तच मिळत नाही.
सध्या एक ते दीड फुटाचे खड्डे तयार झाले असून त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा आणि वाहनांच्या नुकसानीबरोबरच नागरिकांना मणक्यांचा त्रास वाढला आहे.
या गंभीर प्रश्नाबाबत कुणीही बोलायला तयार नाही की लोकप्रतिनिधींनी पुढे काही पाठपुरावा केल्याचे ऐकिवात नाही. नागरिकांच्या हालात दररोज भर पडत आहे हे मात्र निश्चित... (Pits arose in Igatpuri at the expense of citizens Difficult to drive increased back pain Nashik News)
या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी गेल्या पाच वर्षापासून मागणी सुरू आहे. जुना महामार्ग असल्याने येथून मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. मात्र एक ते दीड फुटाच्या खड्ड्यांनी नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
अनेक दुचाकीसह वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेक दुचाकी धारकांना मणक्याचा त्रास सुरु झाला आहे. खड्डे वाचविण्याच्या नादात छोटे मोठे अपघात होत आहे.
त्यातच रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण व रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे स्थानिक नागरिक त्रस्तच झालेच, मात्र बाहेरील येणारे पर्यटक आता इगतपुरीला ‘खड्डेमयपुरी’ म्हणायला लागले आहे.
स्थानिक पक्षाच्या व संघटनेने नेत्यांनी मागच्या वर्षी आंदोलने केले, त्याची दखल घेत आमदार हिरामण खोसकर यांनी यावर्षी या रस्त्याच्या ४०० मीटरचा रस्ता केला. मात्र उर्वरित रस्त्याचे काम रखडलेच असल्याने यंदाच्या पावसाळ्यात नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
शहरातील हा मुख्य रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला असून पावसाळा सुरु होण्याआधी रस्त्याचे काम पूर्ण करू असे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने इगतपुरीकरांना दिली होती. मात्र पावसाळा सुरु झाला तरी रस्त्याचे कामच होत नसल्याने नागरिकांचा तीव्र रोष वाढला आहे.
चार ते पाच महिन्यांपासून अनेक दुचाकी, रिक्षा, चारचाकी वाहनांचे या खड्ड्यांमुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक दुचाकीस्वारांना मणक्याचे आजार वाढले आहे. अनेक जण आजही नाशिकच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.
याकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. यंदाच्या पावसाळ्यात खड्डयांचे पाणी विद्यार्थीसह नागरिकांच्या अंगावर पडत असल्याने नागरिकांना आता निवडणुकीचीच वाट पाहावी लागणार आहे असे चित्र स्पष्ट दिसत आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
उभ्या वाहनांनी अडचणीत भर
आधीच खड्डे वाचवीत वाहने चालविताना शहरात रस्त्याच्या एका बाजूला वाहने उभे असल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
अनेक व्यापाऱ्याची ही उभी असलेली वाहने वाहतुकीस अडथळा आणत आहे. त्यामुळे पायी चालणारे नागरिक त्रस्त झाले असून नगरपालिका प्रशासनाने लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
"गेल्या दोन तीन वर्षापासून आम्ही पावसाळयात इगतपुरीला फिरायला येत असतो. मात्र शहरातील रस्त्यावरील खड्डे आहेत तसेच आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी करतात तरी काय?"
- मनूभाई पटेल, ठाणे, पर्यटक.
"शहरातील वाहनधारकांना वाहने कशी उभे करायची याची शिस्तच नाही. मनमानी पद्धतीने रस्त्यावरच वाहने उभे करत आहे. त्यातच रिक्षावाल्यांची डोकेदुखी वेगळीच. कुठेही ब्रेक मारून प्रवाशांची वाट पाहतात. त्यांच्यामुळे इतरांना मनस्ताप करावा लागत आहे. याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे तरच त्यांना चाप बसेल."- रमेश शिंदे, स्थानिक नागरिक.