नाशिक : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त प्रदर्शित होणाऱ्या ‘जैतर’ चित्रपटाच्या मुख्य कलाकारांनी नाशिक शहर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची भेट घेतली.
चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सायली पाटील ही पोलिस कन्या असून, तिचे वडील धनराज पाटील हे शहर वाहतूक शाखा नाशिक रोड विभागात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. (Police daughter Saili patil powerful entry in marathi movie jaitar nashik news)
आपल्या एका सहकार्याची मुलगी ‘जैतर’ सारख्या सामाजिक व सत्य घटनेवर बेतलेल्या सिनेमात मुख्य नायिका म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण करतेय आणि जिल्ह्यातील कलावंतांनी तयार केलेला सिनेमा असल्याने पोलिस आयुक्तांनी उपनिरीक्षक धनराज पाटील आणि सायलीला भेटीचे निमंत्रण दिले.
या वेळी आयुक्तांनी अभिनेत्री सायली पाटील व सिनेमातील मुख्य नायक रजत गवळी यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या बहुचर्चित चित्रपटासाठी मुख्य भूमिका असलेल्या सायलीचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार सीमा हिरे व देवयानी फरांदे यांनीही कौतुक केले.
पालकांनी मुलांचा कल पाहून त्यांना आवडणाऱ्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे, असे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी व्यक्त केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुमूल्य कार्याप्रति समर्पण भावनेतून त्यांच्या जयंती दिनानिमित्त ‘जैतर’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. शिक्षण हे वाघीणीचं दूध आहे, असे बाबासाहेबांनी समाजाला निक्षून सांगितले होते.
जेणेकरून समाज सुशिक्षित झाला तर देश प्रगती करेल. त्यांचे अधिकार व हक्कांबाबत जागृत राहील. वंचित समाज मूळ प्रवाहात येईल. परंतु अजूनही ग्रामीण भागात खासकरून मुलींच्या शिक्षणाबाबत व अधिकाराबाबत पुरुषसत्ताक वृत्ती अडसर ठरत आहे.
अशीच एक घटना नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे घडली. पौगंडावस्थेतील मुलांचे प्रेमप्रकरण कुटुंबात समजल्यानंतर मुलीचे समुपदेशन करण्याऐवजी तिचे शिक्षण थांबविण्यात आले, तिला डांबून ठेवण्यात आले. मुलाला हालहाल करून मारण्यात आले, त्यानंतर त्याचं पुढे जे झाले, जे घडले त्यावर जैतर हा चित्रपट आधारित आहे.
मालेगाव सोनज गावचे शेतकरी मोहन घोंगडे यांनी पौगंडावस्थेतील मुलांचे व त्यांच्या पालकांचे मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यासाठी जैतर सिनेमाची कथा लिहिली. स्वतः निर्मितीची जबाबदारी स्वीकारली. सिनेमाची कथा, निर्माता, दिग्दर्शक, तंत्रज्ञ व मुख्य कलावंतांसह इतर सर्व कलाकार हे नाशिक जिल्ह्यातील आहेत.
चांदवडचे संगीतकार योगेश खंदारे यांनी संगीतबद्ध केलेली गाणी चित्रपटाचे बलस्थान आहे. प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, हर्षवर्धन वावरे- कस्तुरी वावरे, संगीतकार योगेश खंदारे यांनीही एक गीत लिहिलेले तसेच गायलेले आहे.
चित्रपटाची पटकथा- संवाद आणि दिग्दर्शन घनश्याम पवार यांचे आहे. गणेश सरकटे, गायत्री सोहम, अविनाश पोळ, रामेश्वर डापसे, अरुण गीते, स्मिता प्रभू, जीवन महीरे, माही वाघ तसेच संग्राम साळवी सह इतर कलाकारांनी भूमिका वठविल्या आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.