शेतकरी हवालदिल! तलावाचे पाणी थेट शेतात घुसून जमिनी झाल्या नापीक...कुठे ते वाचा

water in farm.jpg
water in farm.jpg

नाशिक : टेंभे वरचे (ता. बागलाण) येथे यंदा पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे गावतलावाचे पाणी शेतात घुसून जमिनी नापीक बनल्या आहेत. तलावातील पाणी परिसरातील २० पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या ५० ते ६० एकर जमिनीत गुडघाभर पाणी असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. याबाबत शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे यांच्याकडे केली आहे.

वरचे टेंभे येथे शेतकऱ्यांचे नुकसान 

टेंभे वरचे गावाच्या उत्तरेकडे असणाऱ्या गावतलावात गावातील डोंगरउताराचे पाणी जमा होते. यंदा सुरवातीपासून परिसरात पावसाचे प्रमाण चांगले असल्याने जुलै महिन्यातच तलाव भरून गेला. या तलावाला कठडे नसल्याने पाण्याचा फुगवटा आजूबाजूच्या शेतांमध्ये गेल्याने शेते पाण्याने तुडुंब भरली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. अधिकाऱ्यांनी तलावाची पाहणी करून सरंक्षक भिंत बांधावी, अशी मागणी सरपंच किशोर खरे, उपसरपंच मालोजी अहिरे, बाधित शेतकरी सुमनबाई ठाकरे, दत्तात्रय अहिरे, सगुणाबाई अहिरे, भागा चंद, यशवंत वाघ आदींसह इतर बाधित शेतकऱ्यांनी केली आहे. 

परिसर धोक्यात 

तलावाचे पाणी शेतात येत असल्याने परिसरातील विहिरी पाण्याखाली गेल्या आहेत. यातच विजेचे खांब वाकून गेल्याने वीज प्रवाहित तारा जमिनीपासून काही अंतरावर लोंबकळत असल्याचे भयावह चित्र पाहायला मिळत आहे. दुर्दैवाने वाकलेले विजेचे खांब कोसळल्यास मोठी दुर्घटना होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. याबाबत वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांना निवेदने देऊन कोणतीही कार्यवाही होत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. 

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com