Nashik : रामकुंड नव्हे... रामतीर्थ!; हजारो वर्षांपूर्वीचे संदर्भ

Ramkund
Ramkund esakal

नाशिक : दक्षिणवाहिनी गोदावरीमधील तीर्थस्नानाचे अन् सिंहस्थ कुंभमेळ्यात शाहीस्नानाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या नाशिकमधील ‘रामकुंड’ असा उल्लेख १६९६ पासून सुरू झालाय. मात्र प्रत्यक्षात हे रामकुंड नव्हे, तर रामतीर्थ आहे. हजारो वर्षांपूर्वीच ब्रह्मपुराण, आनंद रामायणमध्ये त्यासंबंधीचा उल्लेख अधोरेखित झालेय, म्हणूनच नाशिककर आता ‘रामतीर्थ'साठी आग्रही झाले आहेत. ( references thousands of years ago in Brahmapurana Ananda Ramayana about Ramkund Nashik Latest Marathi News)

ब्रह्मपुराणातील सहाव्या अध्यायातील १४ वा श्‍लोक
षष्ठी र्वर्ष सहस्त्राणी भागिरथ्यवगाहमनम्।
सकृत्गोदावरी स्नानं सिंहस्थेच बृहस्पतो।।

अर्थात, साठ हजार वर्षे भागिरथीमध्ये स्नान करण्यातून जे पुण्य मिळते, ते पुण्य सिंहस्थ कुंभमेळ्यात श्री गोदावरीमधील एका स्नानातून मिळते. गुरू आणि सूर्य हे सिंह राशीत येतात, तेंव्हा सिंहस्थ कुंभमेळ्याचा पर्वकाळ असतो. बारा वर्षांनी हा पर्वकाळ येतो. आता २०२७-२८ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यात हा पर्वकाळ येणार आहे. ब्रह्मपुराणातील सहाव्या अध्यायातील १५ वा श्‍लोक असा : विशेषात् रामचरण प्रदानात् तीर्थसंश्रयात्। अर्थात, प्रभूरामचंद्र यांच्या वास्तव्याने पवित्र असलेले हे तीर्थक्षेत्र होय. स्मार्त चूडामणि शांतारामशास्त्री भानोसे यांनी ‘सकाळ’शी बोलताना आजपर्यंत अप्रकाशित असलेली ही माहिती दिली.

परमपावन रामतीर्थ
रामतीर्थं रामकृतं सीतालक्ष्मणसंस्कृते।
तीर्थें यत्र तु गौतम्यां दृश्‍यतेsद्यापि मानवै :।
रामतीर्थमितिख्यातं ब्रह्महत्याविनाशनम् ।
तस्य स्मरणमात्रेण सर्वपापै : प्रमुख्यते।।

आनंद रामायणमधील हा उल्लेख आहे. अर्थात, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र हे लक्ष्मण आणि श्री जानकीदेवी सीता यांच्यासमवेत वनवासासाठी नाशिकमधील पंचवटीत गौतमी तीरावर आले होते. इथे विधिपूर्वक स्नान करून वडील दशरथ राजा यांच्या श्राद्ध दानादि विधी त्यांनी केला. त्यावेळेपासून हे ठिकाण रामतीर्थ नावाने ओळखले जाऊ लागले. हे तीर्थ ब्रह्महत्या आदी पापांचा विनाश करते. त्याच्या केवळ स्मरणाने पापांचा विनाश होतो, असे वर्णन प्रभू श्रीरामचंद्र यांनी केले आहे.

Ramkund
Nashik : जिल्हा बॅंकेकडून रब्बी हंगामासाठी जिल्ह्यात 10.25 कोटींचे कर्जवाटप

प्रभू श्रीरामचंद्रांचे १३ वर्षे वास्तव्य

नाशिकच्या दंडकारण्यात राक्षसांचे वास्तव्य होते. दंडक राजाला शाप मिळाला होता. हा भूप्रदेश अरण्य झाले आणि त्याला दंडकारण्य असे म्हटले जाऊ लागले. प्रभू श्रीरामचंद्र १४ वर्षांच्या वनवासाच्या कालखंडात १३ वर्षे दंडकारण्यात वास्तव्यास होते. आताच्या काळाराम मंदिराच्या परिसरातील पर्णकुटीत प्रभू श्रीरामचंद्र निवासी होते. ब्रह्मपुराणातील हा दाखला विस्तृतपणे सांगताना श्री. भानोसे म्हणाले, की अयोध्या-चित्रकूटमार्गे प्रभू श्रीरामचंद्र यांना दंडकारण्यात पोचण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागला.

त्या वेळी सिंहस्थ कुंभमेळा होता. शिवाय सीतामाईला शोधण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्र गेले असताना त्या वेळीही दुसरा सिंहस्थ कुंभमेळा होता. प्रभू श्रीरामचंद्र आले असताना गोदावरी मातेला अत्यानंद झाला. प्रभू श्रीरामचंद्र यांची दोन, लक्ष्मणाची दोन, सीतामाईची दोन अशा सहा पावलांचा स्पर्श झाल्याने राक्षसांच्या पातकांनी ग्रस्त झालेल्या गोदावरी मातेने मी पापमुक्त झाल्याचे म्हटले. तेव्हा देवदेवतांनाही आनंद झाला आणि पुष्पवृष्टी करण्यात आली. शिवाय हेच तीर्थक्षेत्र जगाच्या अंतापर्यंत ‘रामतीर्थ' म्हणून विख्यात होईल, अशी आकाशवाणी झाल्याचा उल्लेख आनंद रामायणमध्ये ‘रामतीर्थम् इति ख्यातम्’ अशा श्‍लोकात आढळतो. (क्रमशः)

Ramkund
ओल्या दुष्काळाऐवजी पंचनाम्याचा धडाका; राजू शेट्टी

रामतीर्थाचे रामकुंड कसे झाले?

सातारा जिल्ह्यातील खटावचे जमीनदार चित्रराव खटाव यांनी १६९६ मध्ये रामतीर्थ परिसरात कुंडाचे बांधकाम केल्याचा दस्तऐवज सरकार दप्तरी उपलब्ध आहे. तसेच श्रीमंत माधवराव पेशवे (चौथे पेशवे) यांच्या आई गोपिकाबाई यांनी या कुंडाची दुरुस्ती केल्याची नोंद सरकार दप्तरी आहे. त्यापासून रामतीर्थाचा उल्लेख रामकुंड असा होऊ लागल्याचे धर्म अभ्यासकांचे मानणे आहे. आता मात्र रामकुंड अशा संबोधनाऐवजी ‘रामतीर्थ’ असेच या संपूर्ण पात्राला म्हटले जावे, यासाठी नाशिककर आग्रही आहेत.

"कलियुगात २४ ऋषींनी माणसांच्या आचार-विचारांच्या नियमांची संहिता केली आहे. काही पातकांसाठी उपाय सांगितले आहेत. रामतीर्थात स्नान, दान, मुंडण, उपवास, श्राद्ध आदी विधी केले असता, पापमुक्त होऊन जीवनाच्या मूळ प्रवाहात येता येते. त्रेतायुगात देवदेवतांनी दक्षिणवाहिनी गोदावरीचा ‘रामतीर्थ' असा उल्लेख केला असल्याने आताच्या समाजाने, प्रशासनाने आणि सरकारने ‘रामतीर्थ’ असे संबोधून आपली उत्तुंग परंपरा, शास्त्र-पुराण यांचा आदर करायला हवा." - शांतारामशास्त्री भानोसे (स्मार्त चूडामणि, नाशिक)

"पौराणिक, प्राचीन ग्रंथ, पुराण यामधून ‘रामतीर्थ’ असा उल्लेख अधोरेखित झाल्याने ‘रामतीर्थ’ असा शब्द भाविकांप्रमाणे सरकार आणि प्रशासनाने आपल्या दप्तरी नोंदवून पुढे प्रचलित ठेवणे आवश्‍यक आहे. श्री गंगा गोदावरी पंचकोठी (पुरोहित) संघाचा ‘रामतीर्थ' असा उल्लेख केला जावा, यासाठीचा आग्रह राहणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा हे त्यासाठीचे औचित्य आहे. त्यादृष्टीने पुरोहित संघ प्रयत्नशील राहणार आहे."

- सतीश शुक्ल (अध्यक्ष, श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघ, नाशिक)

Ramkund
‘पोल्ट्री‘साठी सरकारची परवानगी बंधनकारक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com