मालेगाव: राज्यात लहान मुले पळविणारी टोळी आल्याच्या अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरु आहेत. लहान मुले चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याचे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मिडीयावर झळकत आहेत. या अफवांमुळे शहरासह परिसरात भितीचे वातावरण आहे. पालक यामुळे चिंतेत असून, काही पालक मुलांना शाळेत पाठविण्यास देखील धजावत नाहीत. यामुळे पूर्व भागातील शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरल्याचे समजते.
शहरातील पूर्व भागात मुळातच शिक्षणाबद्दल अनास्था आहे. त्यातच अशा अफवांवर विश्वास ठेवल्याने मुलांचे नुकसान होण्याची भिती आहे. येथे उर्दू शाळांची संख्या मोठी आहे. मनपाच्या शाळेतही हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. (Rumors of children kidnyaping gangs police Report Nashik)
पूर्व भागात या अफवांना अक्षरश: उत आला आहे. यामुळे मुले खेळत असतानाही कुटुंबातील सर्वच सदस्य त्यांच्यावर लक्ष ठेवून असतात. याच अफवेतून शहरात नोव्हेंबर २०१९ मध्ये आझादनगर भागात मुले पळविणारी टोळी आल्याचे समजून निरपराध नागरिकांना जबर मारहाण करण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्त्याने त्यांना आश्रय दिल्याने त्यांचा जीव वाचला होता. नव्याने अशा घटना घडणार नाही याची खबरदारी घेतानाच अफवांनाही आळा घालणे, याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. पोलिसांनी देखील सोशल मीडियावर लक्ष केंद्रीत करुन अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी. सोशल मीडियावर समाज कंटकांकडून अफवा पसरविल्या जात आहे. अफवा पसरविणाऱ्यांवर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश घुसर यांनी सांगितले.
शहरातच नव्हे तर विविध भागातून मुले पळविणारी टोळी आल्याच्या अफवा येत आहेत. पालकांनी मुलांची काळजी निश्चित घ्यावी. मात्र, अफवांवर विश्वास ठेवू नये. पोलिसही अफवा पसरविणाऱ्यांवर लक्ष ठेवून आहेत. पोलिस प्रशासनाने सर्व घडामोडी व सोशल मिडीयावरही लक्ष केंद्रीत केले आहे. नागरिकांनी चिंता करु नये. संशयावरुन नाहक कोणाला मारहाण करु नये.
- चंद्रकांत खांडवी, अपर पोलिस अधिक्षक, मालेगाव
जनजागृती गरज
शहरात भीक मागणाऱ्याची संख्या जास्त आहे. अशाच अफवांमधून नोव्हेंबर २०१९ मध्ये आझादनगर भागातील अली अकबर हॉस्पीटलजवळ काही संशयित मुले चोरण्यासाठी आल्याची अफवा पसरली. त्यावेळी संशयितांना जमावाने जबर मारहाण केली. पोलिसांच्या गाड्यांवरही दगडफेक केली होती. सामाजिक कार्यकर्त्याने त्यांना आश्रय दिल्यानंतर व पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागविल्यानंतर जमाव नियंत्रणात आला व अनर्थ टळला. असे प्रकार होणार नाहीत यासाठीही काळजी घेणे आवश्यक आहे. पोलिस, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था, शाळा, धर्मगुरु यांनीही याबाबत जनजागृती करावी.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.