Sant Nivruttinath Palakhi : निवृत्तिनाथांची पालखी नगर जिल्ह्यातील डोंगरगण येथून आज नगरच्या हमाल पंचायत मार्केट यार्डमध्ये विसावणार आहे. गुरुवारी (ता. १५) संत निवृत्तिनाथांचा संजीवन समाधी सोहळा याच ठिकाणी म्हणजे नगर मुक्कामी होणार आहे. (Sant Nivruttinath palkhi will be held on ahmednagar today nashik news)
नगर प्रशासन त्यासाठी सज्ज झाले असून, वारकरीही राज्यभरातून या ठिकाणी दाखल होत आहेत. निवृत्तिनाथांचा संजीवन समाधी सोहळा दर वर्षी आषाढी वारीच्या मार्गावर नगरमध्ये करण्यात येत असतो, ती परंपरा आजही कायम आहे.
ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी निवृत्तिनाथांनी याच दिवशी ज्येष्ठ वद्य १२ शके १२१९ रोजी संजीवन समाधी घेतली. नाथांचा हा ७२६ वा संजीवन समाधी सोहळा त्र्यंबकेश्वर येथे आणि त्याचवेळी वारकऱ्यांच्या समवेत नगर मुक्कामी साजरा होत आहे. त्र्यंबकेश्वरच्या नाथांच्या समाधी मंदिरातही औपचारिक स्वरूपात हा संजीवन समाधी सोहळा साजरा केला जातो.
मात्र निवृत्तिनाथ हे पादुकांच्या रूपाने पंढरपूरच्या वारीत असल्या कारणाने नगर येथेच मोठ्या भव्यदिव्य प्रमाणात हा समाधी सोहळा साजरा केला जातो. संत नामदेवांनी निवृत्तिनाथांच्या संजीवन समाधीचे वर्णन द्रिभूत अंतःकरणाने केलेले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
आपला लहान भाऊ ज्ञानेश्वर, सोपान आणि लाडकी बहीण मुक्ताई यांच्या जीवनकार्याला निरोप देऊन निवृत्तिनाथ थेट त्र्यंबकेश्वरी निघाले आणि त्या ठिकाणी प्रचंड मोठा वैष्णव मेळा टाळ- मृदंगाच्या गजरात निवृत्तिनाथांच्या संजीवन समाधीच्या आसनाजवळ अभंग म्हणत भावविभोर अंतःकरणाने या महान संताला निरोप देण्यासाठी जमला होता.
नामदेवराय आपल्या अभंगात म्हणतात-
धूप पंचारती गंधाक्षता वाहती पूजिला निवृत्ती वैष्णवांनी,
प्रेमे आसुवे येती सकळांचिंये डोळा, माळ घाली गळा पुंडलिक, निवृत्ती देवे ग्रंथ केला होता सार
ठेविला समोर विठोबाच्या, अवघ्या जनालागी केला नमस्कार, उठावले भार वैष्णवांचे,
गोविंद गोपाळ आले ते सकळ
प्रेमे होती विकल निवृत्ती राज
केली आचमने पुष्करनिचे तटी
आले उठाउठी समाधीपाशी
नामा म्हणे देवा निवृत्तीसारखा योगी नाही आता जगी दावावया
ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी असा हा संजीवन समाधी सोहळा नामदेव महाराजांनी संत सज्जनांच्या साक्षीने शब्दातीत केला आहे. नाथांच्या संजीवन समाधीला सात शतके उलटून गेलीत, तरीही निवृत्तिनाथांचे वारकरी संप्रदायात असलेले योगदान सकळ संतमेळ्यातील गुरुस्थान मात्र चिरंजीवी होऊन गेले आहे.
सोहळा पारणे फेडणारा
निवृत्तिनाथांचे अगोदर सारी भावंडे समाधिस्थ झाली. ‘ज्येष्ठांच्या आधी कनिष्ठांचे जाणे झाले, केले नारायणे उफराटे’ असे नामदेवराय निवृत्तिनाथांच्या अंतःकरणातील वेदना व्यक्त करतात. ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी मध्ययुगीन काळात असा हा संतमेळा निवृत्तिनाथांसाठी जमला होता. नामदेवांचे पुत्र नारा महादा गोंदा, विठा परीसा भागवत आदी संत मंडळींनी साश्रूनयनांनी निवृत्तीरायाला निरोप दिला.
त्यांच्या समाधीवर फुले उधळली, भजने म्हटली. पाच दिवस हा समाधीचा सोहळा सुरू होता. निवृत्तीदेवासाठी स्फुंदती ऋषीवर लाविला पदर डोळेयांसि, याच संजीवन समाधीची आठवण आज होत आहे.
निवृत्तिनाथांच्या संजीवन समाधीसाठी जमलेला हा जो जनसागर होता यामध्ये अनेक जाती-जमातीची माणसं होती. ही सारी निवृत्तीवर प्रेम करणारी होती. आपला सखासोबती गेल्याचं दुःख या साऱ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होतं.
कारण मध्ययुगीन काळामध्ये या दीनदुबळ्या, अनाथ, शोषित आणि पीडित लोकांच्या वेदना जाणणारा संत अन्य कुणी नव्हता. ही सर्व साधीभोळी आणि सामान्य माणसे वारकरी संप्रदायाचा आधार बनत होती. आजही तोच उत्साह वारकऱ्यांमध्ये संचारलेला दिसतो. नगरमुखांनी साजरा होणारा हा संजीवन समाधी सोहळा नक्कीच डोळ्यांचे पारणे फेडणारा असेल.