Nashik : एखाद्या कामात सातत्य आणि संकल्प किती दृढ असावा असा प्रश्न विचारायचा असेल तर तो येथील वृक्षमित्र सुनील वसंतराव आहेर यांना विचारावा. गेल्या ९९९ दिवसांपासून दररोज किमान एक तर कमाल अनेक वृक्षारोपण करून तसेच मोठ्या संख्येने रोपांचे वाटप करत आतापर्यंत चाळीस हजाराच्यावर त्यांनी वृक्षलागवड केली आहे.
शुक्रवार (ता.१२) हा त्यांच्या या हरित उपक्रमाचा हजारावा दिवस असल्याने त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. (thousand consecutive days of tree planting through resolve and consistency Green initiative of Sunil Aher tree friend of temple Nashik news)
प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण संवर्धनाचा ध्यास घेतलेल्या सुनील आहेर या ध्येयवेड्या शिक्षकाने शाळा-विद्यालय, अंगणवाडी, नगरपंचायत, ग्रामपंचायत तसेच विविध संस्था कार्यालयांच्या आवारात झाडे असावीत या उद्देशाने मागील ९९९ दिवस रोपांचे वाटप करत त्यांची लागवड करून घेतली आहेत.
विशेष म्हणजे त्यांचे संवर्धन करत ती वाढवली जात आहेत. दरम्यान वसुंधरा अभियान राबवत त्यांनी वृक्षबँक स्थापन केली असून 'मागेल त्याला रोप' ही हरित योजना यशस्वी केली आहे.
भारतीय प्रजातीची वड, पिंपळ, जांभुळ, करंज, आवळा, सिसव अशा रोपांची प्रामुख्याने लागवड करत लावलेल्या झाडांचे फोटो शेअर करण्याची योजना त्यांनी राबवली असल्याने प्रत्येक झाड जगवले जात आहे.
तसेच झाडांचे वाढदिवस साजरे करत त्यांनी वृक्षारोपण करण्यास इतरांना प्रेरित केले आहे. या कामासाठी येथील राष्ट्रीय हरित सेना, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, एनसीसी, सामाजिक वनीकरण यांचेही त्यांना सहकार्य लाभत असते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
प्रिय व्यक्तीच्या स्मरणार्थ स्मृतीवृक्ष, बाळ जन्माला आल्यास आनंदवृक्ष, विवाहप्रसंगी मंगलवृक्ष, वाढदिवसानिमित्त वाढवृक्ष अशा नावाने वटवृक्षांची भेट देत त्यांची प्रत्यक्ष लागवड केली जाते. यातून मोठया प्रमाणात वृक्षारोपणास चालना मिळाली असल्याचे वृक्षमित्र श्री.आहेर यांनी 'सकाळ' ला सांगितले.
"पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण ही लोकचळवळ करत त्यात ठेवलेले सातत्य निश्चितच कौतुकास्पद आहे. वृक्षलागवडीचे संस्कार रुजवण्यात व रोज वृक्षलागवडीसाठी झटण्यासाठी सुनील आहेर यांचे योगदान मोठे आहे. देवळा एज्युकेशन सोसायटी ही संस्था नेहमीच त्यांच्या या कामासाठी सक्रिय व सहकार्याच्या भूमिकेत असते."
- प्राचार्य हितेंद्र आहेर, अध्यक्ष, देवळा एज्युकेशन सोसायटी
"मानवी जीवन व सजीव सृष्टी सुरक्षित ठेवण्यासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे आहे. आणि त्यात सर्वात महत्त्वाची भूमिका वृक्षांची असल्याने आपण सर्वांनी झाडे लावणे व वाढवणे आवश्यक आहे. जल, जमीन आणि जीवन यासाठी वृक्षारोपण गरजेचे आहे. मी हा घेतलेला वसा शेवटच्या श्वासापर्यंत कायम ठेवेल."- सुनील आहेर, वृक्षमित्र
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.