टुडे पान चार मेन फिचर
NSK26H19237
जळगाव : आरोग्य विभागाचे प्रश्न मांडताना उपमहापौर मनोज चौधरी.
---
आरोग्य विभाग ''रडार''वर; ७२ कोटी खर्चूनही अस्वच्छता
महासभेत भाडेतत्त्वावरील वजनकाटा, हजेरीतील अनियमिततेवरून उपमहापौर संतापले
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : शहर स्वच्छतेसाठी महापालिकेकडून दरवर्षी कोट्यवधीचा खर्च केला जात असतानाही नागरिकांकडून अस्वच्छतेबाबत सातत्याने तक्रारी येत असल्याचा मुद्दा उपस्थित करीत उपमहापौर मनोज चौधरी यांनी महासभेत आरोग्य विभागाला धारेवर धरले. कर्मचारी हजेरीतील अनियमितता, वजनकाटा भाड्याने घेण्याची गरज आणि स्वच्छतेवरील खर्च यावरून त्यांनी प्रशासनाला कठोर शब्दांत जाब विचारला.
महापालिकेच्या महासभेत बोलताना उपमहापौरांनी शहर स्वच्छतेसाठी कार्यरत कर्मचाऱ्यांच्या संख्येवर प्रश्न उपस्थित केला. महापालिकेचे सुमारे ४५० तर बीव्हीजी कंपनीचे जवळपास ५०० कर्मचारी असे एकूण ९५० कर्मचारी स्वच्छतेसाठी कार्यरत असल्याचे सांगितले जाते. मात्र एवढे मोठे मनुष्यबळ असतानाही शहरात अनेक भागांत अस्वच्छतेच्या तक्रारी का कायम आहेत, असा प्रश्न उपस्थित केला.
नुकसानीस जबाबदार कोण?
आरोग्य विभागावर वर्षाला सुमारे ७२ कोटी रुपयांचा खर्च होत असताना त्यानुसार अपेक्षित स्वच्छता दिसून येत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. महापालिकेचा स्वतःचा वजनकाटा उपलब्ध असतानाही भाडेतत्त्वावर वजनकाटा घेण्यात येत असल्याने सुमारे १४ लाख ३७ हजार रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. या नुकसानीस जबाबदार कोण, असा थेट प्रश्नही उपमहापौरांनी प्रशासनाला यावेळी विचारला.
कर्मचारी हजेरीत घोळ
काही कर्मचारी भुसावळ येथे वास्तव्यास असूनही त्यांची हजेरी चुकीच्या पद्धतीने नोंदवली जात असल्याचा आरोप करीत उपमहापौरांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. या सर्व मुद्यांवर प्रशासनाने स्पष्ट आणि ठोस उत्तर द्यावे, अन्यथा पुढील महासभेला उपस्थित राहणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच धुळे महापालिकेचा संदर्भ देत त्यांनी तेथील स्वच्छता विभागातील १६ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. अशा प्रकारची कठोर कारवाई जळगाव महापालिकेत का होत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
चौकट
त्रुटी असल्याचे अधिकाऱ्यांनी केले मान्य
उपमहापौरांच्या प्रश्नांना उत्तर देताना आरोग्याधिकारी उदय पाटील यांनी काही त्रुटी असल्याचे मान्य केले. कामात हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक प्रभागासाठी २५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून ते दैनंदिन उपस्थितीवर लक्ष ठेवत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच बीव्हीजी कंपनीवर केलेली दंडात्मक करवाई, कर्मचारी गैरहजर आढळून आल्यास तत्काळ कारवाई केली जाईल, असे आश्वासन आरोग्य अधिकारी पाटील यांनी सभागृहात दिले.