धुळे ः टुडे २ साठी, ॲंकर
--
लोगो छायाचित्र ः ऊस किंवा रसवंतीचे घेणे
--
उन्हाचा कडाका कायम, रोज २५ टनावर उसाचे गाळप
-
जिल्ह्यात रसवंतीगृहांची भर; शेतकरी- विक्रेत्यांना दिलासा, नागरिकांनाही थंडावा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १४ : शहरासह जिल्ह्यात तापमानात चढ-उतार सुरू असतानाही उष्णतेचा कडाका कायम आहे. कमाल तापमान ४५ अंशांवर पोहोल्याने नागरिक हैराण झाले आहेत. उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन नैसर्गिक शीतपेयांकडे कल वाढला आहे. त्यात उसाचा रस सर्वाधिक लोकप्रिय ठरत आहे. या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात रसवंतीगृहांची संख्या वाढली आहे. यानिमित्त रोज अंदाजे २५ टनावर उसाचे गाळप होत आहे.
-
जिल्हाभरात सुमारे ५५० हून अधिक रसवंतीगृहे सुरू झाली आहेत. महामार्ग, चौक, बाजारपेठा आणि ग्रामीण भागातही ही गृहे मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. त्यामुळे प्रवासी व कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांना तत्काळ थंडावा मिळत आहे. दुपारी बारा ते चार या वेळेत उष्णतेची तीव्रता अधिक जाणवते. उष्ण वारे आणि प्रखर सूर्यकिरणांमुळे रस्ते ओस पडत आहेत. नागरिक सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा कामे उरकण्यास प्राधान्य देत आहेत. पांढरे सुती कपडे, टोपी, रुमाल, गॉगल्स यांचा वापर वाढला आहे.
-
स्वच्छता, तंत्रज्ञान वापर
रस विक्रेत्यांनी स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले आहे. अनेक ठिकाणी स्वयंचलित मशिनचा वापर केला जातो. फिल्टर केलेले पाणी, बर्फाची स्वच्छ साठवण यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढला आहे. उसाची आवक समाधानकारक असल्याने दर स्थिर आहेत. एका ग्लाससाठी सरासरी १५ ते २५ रुपये आकारले जात आहेत. दुपारच्या वेळेत ग्राहकांची मोठी गर्दी होते. रोज शेकडो ग्लास रसाची विक्री होत असल्याने व्यवसायात लक्षणीय वाढ झाली आहे.
-
शेतकऱ्यांना थेट फायदा
स्थानिक शेतकऱ्यांकडून उसाची थेट खरेदी केली जात आहे. त्यामुळे बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याचा खर्च कमी होऊन त्यांना चांगला परतावा मिळत आहे. ग्रामीण अर्थचक्राला चालना मिळत असल्याचे चित्र आहे. उसाचा रस शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवतो, उष्णतेत त्वरित ऊर्जा देतो आणि पचनासाठीही उपयुक्त ठरतो. त्यामुळे कृत्रिम शीतपेये टाळून नैसर्गिक पर्यायांकडे नागरिकांचा ओढा वाढला आहे.
-
मागणी आणखी वाढणार
मे अखेरपर्यंत तापमानाचा पारा आणखी वाढण्याचा किंवा सरासरी ४४ ते ४५ अंशापर्यंत राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उसाच्या रसासह इतर नैसर्गिक शीतपेयांची मागणी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नागरिकांना दिलासा आणि विक्रेत्यांना संधी, असे दुहेरी चित्र सध्या जिल्ह्यात दिसत आहे. तापमानात चढ-उतार सुरू असले तरी उष्णतेचा परिणाम कमी झालेला नाही. पुढील काही दिवस उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे.