घोटाणे येथे पाणीवाटपावरून राडा
लाकडी दांड्याने मारहाण; सात जणांवर गुन्हे दाखल
नंदुरबार, ता. १५ : नंदुरबार, ता. १५ : तालुक्यातील घोटाणे गावात पिण्याच्या पाण्याच्या कारणावरून दोन गटात वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीवरून नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात एकूण ७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रामचंद्र गोपीचंद धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते आपल्या नवीन घराच्या बांधकामाला पाणी मारत असताना आरोपींनी ‘तुझ्या बापाचा नळ आहे का?’ असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच पाण्याची मोटार बंद करून रामचंद्र आणि त्यांच्या वडिलांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली. या तक्रारीवरून विठोबा तुकाराम धनगर, नामदेव भटू धनगर, रूपला तुकाराम धनगर आणि तुकाराम आना धनगर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक युवराजसिंग परदेशी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दुसऱ्या गटाकडून विठोबा तुकाराम धनगर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ग्रामपंचायतीने नळाला पाणी सोडलेले असताना रामचंद्र धनगर यांनी व्हॉल्व फिरवून घेतल्यामुळे गल्लीत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. ‘लोकांना प्यायला पाणी नाही आणि तू घराला पाणी मारतोय,’ असे विचारल्याचा राग आल्याने रामचंद्र, गोपीचंद आणि भरत धनगर यांनी विठोबा व त्यांच्या वडिलांना शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी विठोबा यांना लोखंडी विळ्याच्या लाकडी दांड्याने दुखापत करण्यात आली. या तक्रारीवरून रामचंद्र गोपीचंद धनगर, गोपीचंद भाना धनगर आणि भरत गोपीचंद धनगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे पुढील तपास करत आहेत.
---