फोटो : १९२६६
डॉ. नाडकर्णी यांच्या निधनाने वैचारिक विश्वावर शोककळा
मानसिक आरोग्य, साहित्य आणि संस्कृती क्षेत्रातील संवेदनशील विचारवंत हरपला
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ : प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ, लेखक आणि संवेदनशील विचारवंत डॉ. आनंद नाडकर्णी यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने मानसिक आरोग्य, साहित्य, संस्कृती आणि सामाजिक प्रबोधन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नाशिकशी त्यांचे विशेष जिव्हाळ्याचे नाते होते. ‘आयाम’ संस्थेसाठी त्यांनी तब्बल सात वेळा व्याख्याने दिली होती. त्यांच्या ‘गोल्डन हेरिटेज’ या व्याख्यानमालेचे आयोजनही आयामातर्फे करण्यात आले होते.
नाशिकमधील विविध व्याख्याने, संवाद सत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. मानसिक आरोग्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर त्यांनी नाशिककरांशी सातत्याने संवाद साधला. २०२० मध्ये ‘आयाम’ संस्थेतर्फे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित ‘तो महामानव आणि ते भाषण’ या विषयावरील त्यांचे व्याख्यान विशेष गाजले होते. हा कार्यक्रम शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात झाला होता.
वसंत व्याख्यानमालेसह विविध वैचारिक व्यासपीठांशी त्यांचा निकटचा संबंध होता. युवक, पालक आणि शिक्षकांसाठी त्यांनी मानसिक आरोग्य, भावनिक स्वास्थ्य आणि ताणतणाव व्यवस्थापनावर संवाद सत्रे घेतली होती. ‘मनाशी संवाद’सारख्या विषयांवरील त्यांच्या व्याख्यानांना नाशिकमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असे. नातेसंबंध, युवकांचे भावविश्व आणि मानसिक सक्षमता यांसारख्या विषयांवर त्यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.
उद्योग आणि नेतृत्व विकास क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. लघुउद्योग भारती यांच्या ‘संवर्धन’ उपक्रमात आयपीएच संस्थेमार्फत उद्योजकांसाठी भावनिक नेतृत्व आणि मानसिक सक्षमता यावर त्यांनी मार्गदर्शन केले होते.
दरम्यान, त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली.
“माझा अतिशय जवळचा मित्र आणि ज्ञानी माणूस हरपला. मानसशास्त्र हे फक्त आजारापुरते मर्यादित नसून प्रत्येकाच्या आयुष्यासाठी आवश्यक आहे, हे त्यांनी सोप्या भाषेत सांगितले. सकारात्मकता हा त्यांचा स्थायीभाव होता. ‘आनंद मरा नही, आनंद मरते नहीं’ हेच शब्द आता मनात घोळत आहेत,” अशा शब्दांत डॉ. भरत केळकर यांनी श्रद्धांजली वाहिली.
“मानसशास्त्र आणि भारतीय ज्ञानपरंपरेतील नाते मांडणारे ते आधुनिक संत होते. विज्ञान आणि करुणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे त्यांनी सातत्याने मांडले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने सांस्कृतिक जाणिवांचा एक संवेदनशील स्नेही गमावला,” अशी भावना वंदना अत्रे यांनी व्यक्त केली.
“त्यांचे विचारधन अजून खूप हवे होते. प्रत्येक भेटीत त्यांनी आयुष्याला नवी दिशा दिली. शरीराने दूर गेले असले तरी त्यांच्या विचारांचा सहवास कायम राहील,” अशा शब्दांत शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांनी भावना व्यक्त केल्या.
“मानसोपचार तज्ज्ञ म्हणजे ‘वेड्यांचा डॉक्टर’ हा समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. मानसिक आरोग्य क्षेत्रातील एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा अंत झाला आहे,” अशी प्रतिक्रिया प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार यांनी दिली.