पान एक ॲंकर
---------------------
लोगो वापरावा
------------------
अवाढव्य दर अन् ताटात शिळी ‘ग्रेव्ही’
रिसायकल अन्नामुळे विषबाधेचा धोका; अन्न सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून नफेखोरी
अमित यादव : सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २२ : बाहेर चकचकाट आत मात्र किळसवाणा कारभाराचा नमुना शहरातील सर्वच विभागातील आणि मुंबई- आग्रा हायवेवरील छोट्या हॉटेल्सपासून ते काही रिसॉर्ट्सच्या किचनमधून समोर आला आहे. अवाढव्य दर उकळून ग्राहकांच्या ताटात थेट शिळ्या आणि रिसायकल केलेले अन्न वाढले जात आहे. अन्नसुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या या नफेखोरीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. प्रशासनाने अशा निष्काळजी हॉटेलची तपासणी करून कडक कारवाई करावी, अशी मागणी नाशिककरांकडून होत आहे.
शहरातील काही हॉटेल्सच्या अंतर्गत पाहणीत अन्न सुरक्षेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. येथील मुख्य गुदाममध्ये आणि किचनमध्ये साठवून ठेवलेल्या अनेक पॅकेज्ड अन्नपदार्थ, सॉसेस आणि दुग्धजन्य पदार्थांवर उत्पादनाची किंवा कालबाह्यतेची तारीखच नसल्याचे आढळले. अन्न सुरक्षेच्या नियमांनुसार कच्चे आणि शिजवलेले अन्नपदार्थ वेगवेगळ्या तापमानात व स्वतंत्र ठेवणे बंधनकारक असताना, एकाच फ्रीजमध्ये चिकन, मटण पदार्थ आणि उघड्यावर ठेवलेली शिजवलेली ग्रेव्ही व भात शेजारी-शेजारी ठेवल्याचे किळसवाणे प्रकार पाहायला मिळाले. यामुळे अन्नात विषबाधा होण्याचा धोका कमालीचा वाढतो. याव्यतिरिक्त, महामार्गावरील मोठ्या हॉटेलच्या किचनमध्ये कीटक, माशा आणि कमालीची अस्वच्छताही आढळून आली आहे.
---
तपासणीत काय आढळले
- कालबाह्य आणि कच्चा माल
- हॉटेलच्या मुख्य गोदामांमध्ये आणि किचनमध्ये साठवून ठेवलेल्या अनेक कच्च्या मालावर उत्पादनाची किंवा एक्सपायरीची कोणतीही तारीख नमूद नव्हती.
- सर्वात गंभीर बाब म्हणजे, ज्या फ्रीजमध्ये कच्चा माल ठेवला जातो, त्याच फ्रीजमध्ये शिजवलेले अन्न उघड्यावर ठेवले जात असल्याचे आढळले. यामुळे दूषितीकरणाचा धोका प्रचंड वाढतो.
- अनेक दर्जेदार सुविधांचा दावा करणाऱ्या रिसॉर्ट्सच्या किचनमध्ये आणि अन्न साठवणुकीच्या जागी झुरळे, माश्या आणि उंदरांचा उग्र वास येत होता. काही ठिकाणी तर अन्नाच्या जवळच कीटकांचे साम्राज्य पाहायला मिळाले.
‘रिसायकल’चे जीवघेणे गणित
हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर अन्नपदार्थ शिल्लक राहतात. हे शिळे साहित्य फेकून देण्याऐवजी किंवा नष्ट करण्याऐवजी, ते ‘रिसायकल’ केले जाते. रोजचा शिल्लक राहिलेला माल टाकून देऊन नवीन फ्रेश माल आणल्यास हॉटेलचा खर्च वाढतो. हा खर्च वाचवण्यासाठी जुन्या ग्रेव्हीज, शिळे राईस आणि शिळे मटण, चिकन नवीन मसाल्यांमध्ये मिसळून ग्राहकांच्या ताटात ‘फ्रेश’ म्हणून वाढले जाते. यामुळे हॉटेलचा वाया जाणारा माल वाचतो आणि नफा दुप्पट होतो; मात्र ग्राहकांचे आरोग्य धोक्यात येते.
नियम धाब्यावर बसवण्याची मुख्य कारणे
- साठवणूक आणि वाहतुकीचा खर्च वाचवण्यासाठी अनेक हॉटेल्स एकदमच मोठ्या प्रमाणावर कच्चा माल स्वस्त दरात आणून ठेवतात. योग्य कोल्ड स्टोअरेज नसतानाही हा माल कोंडला जातो.
- मंदी आणि नफा कमावण्याच्या नादात हॉटेल्समध्ये पुरेसे हाऊसकिपिंग आणि स्वच्छता कर्मचारी ठेवले जात नाहीत. परिणामी, दररोज किचनची स्वच्छता केली जात नाही.
कडक कारवाईची गरज
या अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर हानी पोचत आहे. दूषित अन्न आणि पाण्याच्या संपर्कामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन जिवाणू संसर्ग) होण्याची शक्यता आहे. विशेषतः नाशिकमधील मोठ्या लग्न समारंभांमध्ये, पार्ट्यांमध्ये किंवा विकेंडला रिसॉर्ट्समध्ये जाणाऱ्या पर्यटकांमध्ये मोठे उद्रेक होण्याची शक्यता आहे. नाशिकची पर्यटननगरी म्हणून असलेली प्रतिमा या प्रकारांमुळे डागाळत आहे. अन्न व औषध प्रशासनाने केवळ कागदोपत्री तपासणी न करता, अशा हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सवर धाडी टाकून त्यांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी नागरिकांकडून आहे.
---------------
उद्याच्या अंकात वाचा डिस्काउंटचे अमिषातून मुदतबाह्य वस्तू ग्राहकांच्या माथी