ब्रँड नवा, डबा जुना अन् आत पामतेल
हजारो टनांच्या खाद्यतेल बाजाराला भेसळीचे ग्रहण
प्रशांत कोतकर : सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २४ : स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे खाद्यतेल. मात्र हेच तेल खरोखर शुद्ध आहे का, हा प्रश्न आज गंभीर बनला आहे. नाशिक जिल्ह्यात खाद्यतेलाच्या भेसळीबाबत अन्न व औषध प्रशासन सातत्याने कारवाया करत असून, लाखो ते कोटी रुपयांचा संशयित साठा जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात दरमहा अंदाजे ११ ते १२ हजार टन खाद्यतेलाची विक्री होत असल्याचा व्यापारी व उद्योग क्षेत्रातील अंदाज आहे. त्यामध्ये पामतेल, सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल आणि शेंगदाणा तेलाचा समावेश आहे. स्वस्त दरामुळे पामतेलाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. याच कारणामुळे भेसळीचा धोका वाढतो.
---
भेसळ कशी केली जाते?
भेसळ करणारे काही व्यापारी किंवा उत्पादक स्वस्त पामतेल महागड्या रिफाइंड तेलात मिसळतात. अनेकदा खुले तेल मोठ्या टाक्यांमध्ये साठवून त्यावर वेगवेगळ्या ब्रँडचे लेबल लावले जाते. काही ठिकाणी पुनर्वापर केलेल्या डब्यांमध्ये तेल भरून विक्री होत असल्याचेही तपासात आढळले आहे. ग्राहकाला सूर्यफूल किंवा सोयाबीन तेल विकत घेतल्याची भावना निर्माण होते; मात्र प्रत्यक्षात त्यामध्ये पामतेलाचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता असते. अशा प्रकारामुळे ग्राहकांची आर्थिक फसवणूक तर होतेच, शिवाय गुणवत्तेबाबतही प्रश्न निर्माण होतात.
---
नाशिकमध्ये कोटींचे तेल जप्त
२०२२ मध्ये नाशिकमधील एका रिफायनर्सवर ‘एफडीए’ने धाड टाकून सुमारे १.१० कोटी रुपयांचा खाद्यतेल साठा जप्त केला होता. तपासात लेबल दोष, फोर्टिफाइड असल्याचा दावा आणि प्रत्यक्षातील विसंगती आढळून आली होती. विविध नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतरही कारवाया सुरूच राहिल्या. मालेगाव एमआयडीसी परिसरात खुले रिफाइंड सोयाबीन तेल आणि पामोलिन तेलाचा साठा जप्त करण्यात आला. पुनर्वापर केलेल्या डब्यांमध्ये तेल साठविल्याने भेसळीचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
--
भेसळीमागील अर्थकारण
तज्ज्ञांच्या मते, पामतेल आणि इतर खाद्यतेलांच्या दरात मोठा फरक असतो. उदाहरणार्थ, पामतेलाचा घाऊक दर तुलनेने कमी असल्याने त्याचे मिश्रण करून व्यापाऱ्यांना मोठा नफा मिळू शकतो. समजा एखाद्या व्यापाऱ्याने १००० लिटर महागड्या तेलात ३०० ते ४०० लिटर पामतेल मिसळले, तर ग्राहकाला फरक जाणवणे कठीण असते. मात्र विक्रेत्याचा नफा लक्षणीय वाढतो. याच लालसेतून भेसळीचे प्रकार घडतात.
---
ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?
- शक्यतो बंद पॅकचे तेल खरेदी करावे.
- एफएसएसएआय परवाना क्रमांक तपासावा.
- अत्यंत स्वस्त दरातील तेलाबाबत सावध राहावे.
- रंग, वास किंवा चव वेगळी वाटल्यास तक्रार करावी.
- खुले किंवा पुनर्भरित डब्यातील तेल घेणे टाळावे.
- बिल घेणे अनिवार्य करावे.
----चौकट
प्रशासनासमोर आव्हान
नाशिकसारख्या मोठ्या जिल्ह्यात हजारो किरकोळ विक्रेते, घाऊक व्यापारी, हॉटेल्स, मिठाई उत्पादक आणि खाद्यपदार्थ उद्योग कार्यरत आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी तपासणी करणे प्रशासनासाठी मोठे आव्हान आहे. नाशिकचा खाद्यतेल बाजार हजारो टनांचा असून त्यामध्ये पामतेलाचा मोठा वाटा आहे. सर्वच पामतेल भेसळयुक्त असते असे नाही; परंतु स्वस्त पामतेलाचा वापर करून महागड्या तेलाची विक्री केल्याच्या तक्रारी आणि कारवाया वारंवार समोर येत आहेत. कोटी रुपयांच्या जप्तीपासून ते अलीकडील एफडीए मोहिमांपर्यंतची आकडेवारी पाहता, ग्राहकांनी जागरूक राहणे आणि प्रशासनाने कारवाया अधिक तीव्र करणे ही काळाची गरज आहे. अन्नातील भेसळ ही केवळ आर्थिक फसवणूक नसून ती आरोग्यावरचा घात आहे. ग्राहक जागरूक राहिला, विक्रेता प्रामाणिक राहिला आणि प्रशासन सतर्क राहिले तरच शुद्ध अन्नाचा अधिकार प्रत्यक्षात येईल.