बातमी आजच घ्यावी
-------------------
केळीप्रश्नासंदर्भात आज
मुख्यमंत्र्यासोबत बैठक
जळगाव, ता. २२ : जिल्ह्यासह राज्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उद्या (ता. २३) दुपारी पावणेदोनला विधान भवन, मुंबई येथील मुख्यमंत्री समिती कक्षात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे यापूर्वी १० जूनला मंत्रालयात राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विशेष चर्चा करण्यात आली होती. या बैठकीत पालकमंत्री पाटील यांनी पीकविम्याबाबत तसेच एमआरएसएसी अहवालाबाबत तांत्रिक अडचणी तसेच केळी उत्पादकांना विशेष आर्थिक सहाय्य देण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी त्यांनी मध्यप्रदेशच्या धर्तीवर नुकसानग्रस्त केळी उत्पादकांना प्रति हेक्टर दोन लाख रुपये विशेष मदत देण्याची जोरदार मागणी केली होती. पालकमंत्री पाटील यांनी मांडलेल्या मागण्यांबाबत कृषिमंत्री भरणे यांनी सकारात्मक भूमिका घेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.