NSK26H22348
नाशिक : श्रीराम विद्यालयात २००५-०६ मधील दहावीच्या (ब व क) तुकडीतील एकत्र आलेले माजी विद्यार्थी.
पुन्हा वाजली शाळेची घंटा... आणि २१ वर्षांपूर्वीचे बालपण परत आले!
श्रीराम विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन; आठवणी, मैत्री आणि गुरुजनांप्रति कृतज्ञतेचा भावनिक सोहळा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२३ : शाळेची घंटा वाजली... वर्गात हजेरी लागली... बाकांवर पुन्हा जुन्या मित्रांची गर्दी झाली आणि क्षणार्धात २१ वर्षांचा काळ मागे फिरला. पंचवटी येथील तरुण ऐक्य मंडळ संचलित श्रीराम विद्यालयाच्या २००५-०६ मधील दहावीच्या (ब व क) तुकडीतील माजी विद्यार्थ्यांनी तब्बल दोन दशकांनंतर शाळेत पुन्हा एकत्र येत बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
सुमारे ६० माजी विद्यार्थी या स्नेहसंमेलनासाठी उपस्थित होते. शाळेच्या परिसरात पाऊल टाकताच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह, कुतूहल आणि जुन्या आठवणींची ओढ स्पष्ट दिसत होती. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. कोविड काळात आणि त्यानंतर दिवंगत झालेल्या शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करत सर्वांनी भावपूर्ण स्मरण केले.
यानंतर रंगली ती आठवणींची मैफल. वर्गातील खोड्या, गृहपाठ न केल्यावर मिळालेली शिक्षा, डब्यातील पदार्थांची वाटणी, मैदानावरील खेळ आणि परीक्षेच्या दिवसांतील गंमतीजमती यांचा एकामागून एक उलगडा होत गेला. प्रत्येक आठवणीसोबत हास्याचे फवारे उडत होते, तर काही क्षण डोळ्यांच्या कडा ओलावून जात होते.
या प्रसंगी संस्थेचे सचिव मुखेडकर, मुख्याध्यापक उमेश आठवणे, पाटील सर, श्रीमती फोकणे, श्रीमती नागपुरे, श्रीमती अहिरे तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. गुरुजनांनी विद्यार्थ्यांना आशीर्वाद देत जीवनात संस्कारांची शिदोरी जपण्याचा संदेश दिला.
विशेष म्हणजे, केवळ आठवणींच्या भेटीपुरते हे संमेलन मर्यादित राहिले नाही. आपल्या शाळेसाठी आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी भविष्यात कशाप्रकारे योगदान देता येईल, यावरही सकारात्मक चर्चा झाली. दिवस संपला, पण प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती वय वाढले, जबाबदाऱ्या वाढल्या; मात्र शाळा, मित्र आणि त्या आठवणी आजही तितक्याच जिवंत आहेत.