टुडे पान एकसाठी ॲंकर
------
(एआयचे चित्र वापरावे)
-----------
‘सीएससी’ असूनही दाखले काढण्यास सेतू केंद्राकडे धाव
-------
जि.प.चे ग्रामपंचायतींना उद्दिष्ट; जिल्ह्यातील गावांत पाचशेहून अधिक ऑनलाईन सुविधा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २४ : ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय सेवा गावपातळीवर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी अनेक ग्रामपंचायतींत ‘सीएससी’ सेंटर सुरू करण्यात आले आहेत. विविध दाखले, प्रमाणपत्रे व ऑनलाइन अर्जांची सुविधा उपलब्ध असूनही अनेक ग्रामस्थ आजही दाखले काढण्यासाठी सेतू केंद्रांवर धाव घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाकडून आता ग्रामपंचायतींना दररोज दोन दाखले काढण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा पोहोचल्यानंतरही आतापर्यंत ग्रामपंचायतींत कागदोपत्री कामकाज केले जात होते. गावात विद्यार्थी व नागरिकांना आवश्यक असलेले दाखले काढण्याची सुविधा नसल्याने त्यांना तालुका किंवा शहरात यावे लागत होते. ही समस्या दूर करण्यासाठी ग्रामपंचायतींत आपले सेवा केंद्र सुरू करून या ठिकाणी सर्वच ऑनलाईन सुविधांसह दाखले काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
ग्रामपंचायतीत १०० टक्के सेवा
जिल्ह्यात १,१६८ ग्रामपंचायती आहेत. यातील १,१६० ग्रामपंचायतींत आपले सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यांचे यूजर आयडी व पासवर्डही तयार झाले आहेत. अर्थात जिल्ह्यात शंभर टक्के काम झाले आहे. यातील ८५० ग्रामपंचायतींत ऑपरेटर नेमले आहेत. उर्वरीत ग्रामपंचायतींत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन दाखले काढण्याची सेवा दिली जात आहे.
ग्रामस्थांना माहितीचा अभाव
ग्रामपंचायतींतील ‘सीएससी’ केंद्रात रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, जन्म-मृत्यू दाखल्यांच्या प्रती, सातबारा, विविध शासकीय योजनांचे अर्ज यांसारख्या साधारण साडेपाचशेहून अधिक सेवा उपलब्ध आहेत. मात्र, अनेक ग्रामस्थांना ग्रामपंचायतीत मिळणाऱ्या या सुविधांची पुरेशी माहितीच नाही किंवा काही तांत्रिक अडचणींमुळे गावातील जनता थेट सेतू केंद्रांत जाणे पसंत करतात.
----------
इन्फो
दिवसाला तीन दाखले काढा
ग्रामपंचायतीत सुरू केलेल्या आपले सेवा केंद्रातून दाखले काढण्यासाठी ग्रामस्थ जात नाहीत. त्यामुळे आपले सेवा केंद्र ओस पडलेले असतात. दरम्यान, ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायतींना दररोज तीन दाखले काढण्याचे उद्दिष्ट दिले आहे. या उद्दीष्टानुसार सोमवारी (ता.२२) जिल्ह्याातील सर्व ग्रामपंचायतींमधून दोन हजार दाखले काढण्यात आले आहेत.
––––
कोट
ग्रामपंचायतींत ‘सीएससी’ केंद्र सुरू झाले आहेत. परंतु, फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने ग्रामस्थांना माहिती मिळावी, यासाठी बॅनर लावणे व प्रत्येक ग्रामपंचायतीमधून दररोज तीन दाखले काढण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
– करिश्मा नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव.