धोकादायक इमारतींकडे दुर्लक्ष महागात पडणार

धोकादायक इमारतींकडे दुर्लक्ष महागात पडणार
Published on
मेनफिचर टुडे पान चारसाठी ------------------------- NSK26H22403 जळगाव : शहरात नवीपेठमधील जीर्ण झालेली इमारत. ------------------------------------ धोकादायक इमारतींकडे दुर्लक्ष महागात पडणार? -- महापालिकेच्या १०७ मालमत्ताधारकांना नोटीसा; दुर्घटना टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २४ : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. शहरात सध्या १०७ इमारती संरचनात्मकदृष्ट्या असुरक्षित असल्याची नोंद महापालिका प्रशासनाकडे आहे. या इमारतींमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून ही शक्यता लक्षात घेता महापालिकेने संबंधित इमारतमालक, भाडेकरू व भोगवटादारांना नोटिसा पाठवून पुन्हा एकदा कठोर इशारा दिला आहे. महापालिकेने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम २६४ व २६८अन्वये संबंधित मालमत्ताधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसांमध्ये इमारतींची तांत्रिक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करणे, इमारत रिकामी करणे, धोकादायक भाग पाडणे किंवा अन्य सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले होते. शिवाय सात दिवसांच्या आत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. दुर्घटना घडल्यास मालक जबाबदार विशेष म्हणजे अनेक प्रकरणांत नोटिसा बजावूनही संबंधित मालकांकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली दिसत नसल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासनाने आता अधिक कठोर भूमिका घेतली आहे. महापालिकेने स्पष्ट केले आहे की, धोकादायक घोषित केलेल्या इमारतींत अतिवृष्टी, भिंत किंवा छत कोसळणे, शॉर्टसर्किट किंवा अन्य कारणांमुळे दुर्घटना घडल्यास त्यातून होणाऱ्या जीवितहानी अथवा वित्तीय नुकसानीसाठी संबंधित मालक, भोगवटादार किंवा भाडेकरू जबाबदार राहतील. अशा घटनांत महापालिकेवर जबाबदारी राहणार नसल्याचे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. मालमत्ताधारकांचे दुर्लक्ष विशेष म्हणजे, शहरात दरवर्षी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून नोटिसा देण्यात येतात. मात्र, अनेक मालक आर्थिक कारणे, मालकी हक्काचे वाद किंवा निष्काळजीपणामुळे दुरुस्ती अथवा पाडकामाची कार्यवाही करीत नाहीत. परिणामी अशा इमारती वर्षांनुवर्षे धोक्याची घंटा ठरत आहेत. ... तर कारवाई होणार यंदा मात्र, केवळ नोटिसांवर न थांबता संबंधित मालमत्तांवर अतिरिक्त शुल्क आकारणी, दंडात्मक कारवाई व नियमांचे पालन न करणाऱ्या मालकांविरुद्ध अधिक कठोर प्रशासकीय उपाययोजना करण्याचा विचार महापालिका प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी धोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे व मालकांनी आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. अशी आकडेवारी शहरातील एकूण धोकादायक इमारती.....१०७ - प्रभाग समिती क्रमांक- १ ........५३ - प्रभाग समिती क्रमांक २.......४१ - प्रभाग समिती क्रमांक ३.......०० - प्रभाग समिती क्रमांक ४.......१३
Marathi News Esakal
www.esakal.com