धुळे : टुडे पान ३ साठी..
--
खानदेश एक्स्प्रेस आता आठवड्यातून सहा दिवस
--
पालकमंत्री जयकुमार रावल यांची माहिती; तिकीट दरात २० ते २५ टक्के कपात
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २४ : खानदेशातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची असणारी दादर ते भुसावळ खानदेश एक्सप्रेस आता आठवड्यातून सहा दिवस धावणार असून हा बदल एक ऑगस्टपासून लागू होणार आहे. या निर्णयामुळे खानदेशातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांचा मुंबई प्रवास अधिक सुकर आणि गतिमान होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. या निर्णयाबद्दल पालकमंत्री रावल यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे विशेष आभार मानले.
-
यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या ‘दादर- भुसावळ स्पेशल एक्स्प्रेस’ या गाडीला नियमित खानदेश एक्स्प्रेसप्रमाणे कायमस्वरूपी करावे आणि प्रवाशांवरील अतिरिक्त भाडेवाढ कमी करावी, अशी मागणी वेळोवेळी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे करण्यात येत होती. जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लक्षात घेऊन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अखेर हा निर्णय घेतला. यामुळे खानदेश आणि मुंबईदरम्यानची रेल्वे कनेक्टिव्हिटी आता अधिक मजबूत होणार आहे. या गाडीला आता ‘विशेष’ ऐवजी नियमित गाडीचा दर्जा देण्यात आला असून, ती आठवड्यातून सहा दिवस दादर- भुसावळ या मार्गावर धावणार आहे. पालकमंत्री रावल यांनी सांगितले, की या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, तिकीट दरात सुमारे २० ते २५ टक्क्यांपर्यंत घट होईल. नियमित खानदेश एक्स्प्रेसच्या दराप्रमाणेच या गाडीचे तिकीट दर राहतील. याशिवाय या गाडीला आता बोईसर आणि डहाणू रोड येथे अतिरिक्त थांबे देण्यात आले आहेत. ज्यामुळे स्थानिक प्रवाशांची सोय अधिक वाढणार आहे. या गाडीला नियमित दर्जा मिळाल्यामुळे व्यापारी, नोकरदार, विद्यार्थी आणि विशेषतः मुंबईला उपचारांसाठी जाणाऱ्या रुग्णांना मोठा आर्थिक व मानसिक दिलासा मिळणार आहे. आता ही रेल्वे सेवा अधिक किफायतशीर झाल्याने खानदेशातील प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.