मुख्य अंक पान--३
--------------
राज्यसेवा परीक्षेतून ‘वैकल्पिक विषय’ रद्द
----------
एमपीएससीचा निर्णय; २०२७ पासून संयुक्त पूर्वपरीक्षा वर्षातून दोनदा
----------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २६ ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा प्रक्रियेतील बदलासंदर्भात दोन महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. हे बदल २०२७ पासून लागू होणार आहेत. त्यानुसार राज्यसेवा मुख्य परीक्षेतून ‘वैकल्पिक विषय’ (ऑप्शनल) पूर्णपणे वगळण्यात आला आहे. दुसरीकडे गट-अ, गट-ब आणि गट-क या परीक्षांसाठीची संयुक्त पूर्वपरीक्षा आता वर्षातून दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा घेण्याबाबतही निर्णय घेतला आहे.
तमिळनाडू, तेलंगणा, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार अशा देशातील विविध राज्यांचा अभ्यास केल्यानंतर ‘एमपीएससी’ने वैकल्पिक विषय वगळण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्व उमेदवारांचे मूल्यमापन अधिक एकसमान आणि प्रमाणित पद्धतीने करणे सोपे जाणार असल्याचे आयोगाचे म्हणणे आहे. यापूर्वी आयोगाने राज्यसेवा परीक्षेचे स्वरूप बदलले होते. यापूर्वी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या परीक्षेऐवजी मुख्य परीक्षा वर्णणात्मक स्वरूपात केली आहे. त्यापाठोपाठ आता परीक्षा पद्धतीमध्ये आणखी एक महत्त्वाचा बदल करताना आयोगाने हा निर्णय जाहीर केला आहे.
महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेसाठी वैकल्पिक विषयांची तरतूद पूर्वीप्रमाणेच लागू राहील. अभियांत्रिकी, कृषी, वैद्यकीय सेवा परीक्षांच्या योजनेत बदल नाही, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये या निर्णयाचे काय पडसाद उमटतात, याकडे लक्ष लागून राहणार आहे.
----
२०-२ चौकट करणे
अशी असेल सुधारित परीक्षा
-एकूण गुण (लेखी परीक्षा व मुलाखत)- १,५२५ गुण
-अनिवार्य भाषा पेपर्स : मराठी (३०० गुण) आणि इंग्रजी (३०० गुण) - (फक्त २५ टक्के गुणांसह अर्हताकारी).
-निबंध (मराठी किंवा इंग्रजी) : २५० गुण
-सामान्य अध्ययन १ ते ४ ः प्रत्येक २५० प्रमाणे १,००० गुण
-मुलाखत : २७५ गुण
--------------
१६-१
वर्षातून दोनपेक्षा अधिक वेळा परीक्षा
सद्यःस्थितीत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्वपरीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्वपरीक्षा या तिन्ही परीक्षा वर्षातून केवळ एकदा होतात. यामुळे केवळ एका परीक्षेतील अपयशामुळे विद्यार्थ्यांचे संपूर्ण वर्ष वाया जाते. हा अनावश्यक ताण कमी करण्यासाठी या तिन्ही पूर्वपरीक्षा वर्षातून दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. ही नवीन कार्यपद्धती २०२७ च्या पूर्व परीक्षांपासून लागू केली जाईल. परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये झाल्यास, उमेदवारांच्या गुणांचे पारदर्शक पद्धतीने समानीकरण केले जाईल. मुख्य परीक्षा वर्षातून एकदाच होणार असून, पूर्वपरीक्षांपैकी कोणत्याही एका पूर्वपरीक्षेतून पात्र ठरणारे सर्व उमेदवार त्या वर्षाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील, असे आयोगाने पत्रकात स्पष्ट केले आहे.
------------