३६-३
पंचवटी, राज्यराणीचे वेळेचे पालन करावे
खासदार वाजे आक्रमक; मध्य रेल्वेकडे नोंदविल्या शंभर मागण्या
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता, २६ : पंचवटी व राज्यराणी एक्सप्रेसला अतिरिक्त डबे व स्वतंत्र रेक उपलब्ध करून देतानाच या दोन्ही रेल्वेंच्या वेळा पाळाव्यात अशी आग्रही मागणी खासदार राजाभाऊ वाजे यांनी मध्य रेल्वेकडे केली. सिंहस्थाच्या अनुषंगाने भाविकांच्या सुरक्षेसाठी मास्टर प्लॅन तयार करताना नाशिकरोड व ओढा रेल्वेस्थानकाचे मार्च २०२७ पर्यंत आधुनिकीकरण करावे अशी सूचना त्यांनी केली.श्री. वाजेंनी नाशिकच्या रेल्वेसंदर्भातील शंभरहून अधिक मागण्या आक्रमकपणे मांडल्या.
मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गुरुवारी (ता.२५) त्रैमासिक आढावा बैठक पार पडली. खासदार वाजे यांनी नाशिक जिल्ह्याच्या रेल्वे विकासाशी संबंधित सर्व प्रलंबित प्रश्नांवर ठाम भूमिका मांडली. सिंहस्थाच्या अनुषंगाने नाशिकच्या रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा सर्वांगिण विकास तातडीने करणे गरजेचे असल्याची बाब त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.
नाशिकरोड हे मध्य रेल्वेतील सर्वाधिक महसूल देणाऱ्या स्थानकांपैकी एक असूनही महत्त्वाच्या रेल्वेगाड्या येथे थांबत नसल्याबद्दल वाजेंनी नाराजी व्यक्त केली. दुरांतो, हमसफरसारख्या सध्याच्या १५ रेल्वेंना नाशिकरोड येथे थांबा द्यावा. नवीन रेल्वेगाड्यांसह लोकल सेवा कार्यन्वित करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच स्टेशन आधुनिकीकरण, रेल्वे उड्डाणपूल, भुयारी मार्ग, मालवाहतूक सुविधा, लॉजिस्टिक्स पार्क, वंदे भारत उत्पादन केंद्र, रेल्वे कार्यशाळा विस्तार आणि भविष्यातील रेल्वे प्रकल्प अशा विषयांवर त्यांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले.
---
१६-१
प्रकल्पांना गती द्यावी
खा. राजाभाऊ वाजे यांनी बैठकीत नाशिक जिल्ह्यातील रेल्वे प्रकल्पांवर प्रकाशझोत टाकला. यावेळी कसारा–मनमाड तिसरी-चौथी लाईन, नाशिक-डहाणू रेल्वेमार्ग, नाशिक-शिर्डी रेल्वे, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे, मनमाड–इंदूर प्रकल्पांबाबत गती देण्याची आग्रही मागणी त्यांनी केली.
---
१६-१ चौकट
बैठकीतील प्रमुख मागण्या
-नाशिकरोडला दुरांतो, हमसफरसह १५ गाड्यांना थांबा द्यावा
-देवळाली कॅम्प येथील पूर्वीचे थांबे पुन्हा सुरू करणे
-नाशिक–कोल्हापूर दैनंदिन एक्स्प्रेस सेवा द्यावी
-तिरुपती, अयोध्या, वाराणसीसाठी थेट रेल्वे सुरु करावी
-पंचवटी व राज्यराणी एक्स्प्रेसच्या वेळेचे पालन करावे
-नाशिक-मुंबई मेमू लोकल सेवा सुरू करणे
-एकलहरे येथे वंदे भारत उत्पादन केंद्र उभारावे
---
कोट
रेल्वेचे प्रश्न जटिल असून त्यांचा सातत्याने पाठपुरवठा सुरु आहे. गेल्या बैठकीतील मागणी केलेले बरीच काम पूर्णत्वास आली आहेत. आगामी काळात अजून काही मागण्याची जोड दिली आहे. सिंहस्थासंबंधी कामे आगामी काही महिन्यात पूर्ण करून घेणे हे महत्त्वाचे आव्हान आहे.
-राजाभाऊ वाजे, खासदार.
--------------------
-------------------
------------------
फोटो क्रमांक : एच-22580