भाजप अजूनही मनुस्मृतीच्या मानसिकतेत
पृथ्वीराज चव्हाण : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांविषयी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३१ : उत्तराखंडमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर त्या ठिकाणी पूजा करून स्वच्छता केल्याचा प्रकार लांच्छनास्पद आहे. यातून भारतीय जनता पक्षाची मानसिकता काय आहे, हे स्पष्ट होते. भाजप अजूनही मनुस्मृतीच्या प्रभावातून बाहेर आलेला नाही आणि ते कधी बाहेर पडणारही नाहीत, याची खात्री पटल्याची टीका काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी सोमवारी (ता. ३१) शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा समाचार घेतला. ते म्हणाले, की मुख्यमंत्र्यांसारख्या जबाबदार पदावरील व्यक्तीने सिंहस्थ कुंभमेळ्याविषयी असे बोलणे शोभनीय नाही. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी खर्च केला जाणारा निधी हा मुख्यमंत्र्यांच्या घरचा पैसा नाही, तर जनतेचा पैसा आहे. नाशिकचा विकास झालाच पाहिजे आणि सिंहस्थ कुंभमेळ्यानंतरही ही विकासकामे टिकली पाहिजेत, यात दुमत नाही. मात्र जनतेचा हा पैसा नेमका कसा खर्च होतो, याचा हिशेब पारदर्शक पद्धतीने समोर आला पाहिजे. नाशिककरांना विश्वासात न घेता हे काम सुरू असल्याने लोकसहभाग शून्य असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत. राज्यात शेतकरी आत्महत्या, महिला व बालकांवरील अत्याचार आणि लुटालुटीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. समृद्धी महामार्गावर लोक सुरक्षित नाहीत. मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत स्वतः लक्ष घालून ही परिस्थिती सुधारली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.
जरांगेंची सरकारने दिशाभूल केली
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जरांगे-पाटील यांच्यासोबत नेमके काय करार झाले होते, हे मला माहीत नाही. मात्र, जरांगेंच्या मोर्चाला जनतेने मोठा प्रतिसाद दिला होता. सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले. आता ते पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत, याचा अर्थ सरकारने नक्कीच त्यांची दिशाभूल केली आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे.